- कोमल जाधव
राजकारण, सत्ताकारणाचा खेळ कधी आणि कसा बदलेल हे सांगता येत नाही. भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळातलं मोठं नाव म्हणजे नितीन गडकरी. विदर्भातलं हे नेतृत्व सध्या केंद्रीय स्तरावर आहे. आणि त्यांच्या खात्यानं केलेल्या रस्तेनिर्मितीच्या कामांमुळे देशभरात त्यांची वाहवाच होत असते. पण आता याच नितीन गडकरींचा अडवाणी होणार काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. (Nitin Gadkari and LK Adwani news in Marathi)
कारण भारतीय जनता पार्टीनं आज केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, के. लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, आणि बी. एल. संतोष या नेत्यांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे गडकरींनी राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मात्र केंद्रीय निवडणूक समितीसोबतच भाजपाच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे भाजप गडकरींना हळूहळू केंद्रीय स्तरावरील समित्यांमधून आणि परिणामी राजकारणातून दूर ढकलत चाललंय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यातच काही दिवसांपूर्वी नागपुरातील एका कार्यक्रमात नितीन गडकरींनीही सध्याचं राजकारण पाहता अनेकदा राजकारण सोडावं वाटतंय अशी भावना व्यक्त केली होती.
त्यावेळी गडकरी म्हणाले होते की, राजकारण शब्दाचा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे. राजकारण हे समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे की सत्ताकारण आहे? जुन्या काळामध्ये महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेनं कार्य झालं ते पॉलिटिक्स होतं पण ते राष्ट्रकारण, समाजकारण, विकासकारण होतं. आणि आता जे बघतो ते केवळ १०० टक्के सत्ताकारण बघतो. त्यामुळे सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रभावी अंग आहे. आणि म्हणून या राजकारणात राहत असताना शिक्षण, साहित्य, संस्कृती, कला, पर्यावरण या क्षेत्रासाठी काम केलं पाहिजे. मलाच हळूहळू वाटायला लागलंय की, मीच राजकारण कधी सोडावं अन् कधी नाही? राजकारणापेक्षा बऱ्याच गोष्टी आयुष्यात करायच्या असतात, असं गडकरी म्हणाले होते.
त्यामुळे गडकरींच्या राजकारण सोडण्याविषयीच्या वक्तव्याला महिना होत नाही, तोच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय समितीतून त्यांचं नाव वगळण्यात आलंय. त्यामुळे राजकारण सोडण्याविषयी गडकरींनी केलेल्या वक्त्यव्यामुळेच भाजपनं त्यांना बाजूला केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.