पाटणा - जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी प्रकरणी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर देशभरातील तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. लालू यादव आणि त्यांच्या मुला-मुलींच्या विरोधात घोटाळ्याचे ठोस पुरावे असल्याचा ईडी आणि सीबीआयचा दावा आहे. या संपूर्ण प्रकरणात नितीश कुमार यांच्या मौनामुळे चर्चांना उधाण आले होते. यावर. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.
नितीश कुमार म्हणाले की, 2017 मध्येही छापेमारी झाली होती, त्यानंतर आम्ही महाआघाडीपासून फारकत घेतली. 5 वर्षे उलटून गेली आणि आता आम्ही एकत्र आलो. आता पुन्हा धाडी टाकण्यात येत आहेत. यावर आता मी काय बोलू? ज्यांच्या विरोधात समन्स बजावण्यात आले आहेत ते उत्तरे देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कुठेतरी काय घडते यावर आपण प्रतिक्रिया देत बसणार नाही, असंही नितीश यांनी म्हटलं.
सीबीआयचे म्हणणे आहे की लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना कथित जमीन घोटाळा झाला होता. रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी गुपचूप 12 जणांना ग्रुप डीच्या नोकऱ्या दिल्याचा आरोप आहे. नोकरीच्या बदल्यात पाटण्यातील जमीन त्यांच्या कुटुंबियांच्या नावे लिहून दिली.
लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी, मुलगी मिसा भारती आणि हेमा यादव यांच्या नावावर भूखंडांची नोंदणी करण्यात आली होती आणि जमिनीची नाममात्र किंमत रोख स्वरूपात देण्यात आली होती. तसेच मध्य रेल्वेलाही माहिती देण्यात आली नव्हती, असा सीबीआयचा दावा आहे. अर्ज केल्यानंतर १५ दिवसांत नोकरी देण्यात आली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.