नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्यामध्ये अनेकांची भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदींची देखील वेळ मागून त्यांनी भेट घेतल्याचं दिसून आलंय. मात्र, त्यांनी या दौऱ्यात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली नाही. मागच्या वेळी जेंव्हा त्या दिल्ली दौऱ्यावर आल्या होत्या तेंव्हा त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती. याच पार्श्वभूमीवर जेंव्हा ममता बॅनर्जी यांना 'तुम्ही सोनिया गांधींना का भेटला नाहीत?' असा प्रश्न विचारण्यात आला तेंव्हा त्यांनी याबाबत दिलेलं उत्तर हे चर्चेचं कारण ठरलं आहे. प्रत्येकवेळी मी दिल्लीला आल्यानंतर सोनिया गांधींना भेटणं हे काही 'घटनात्मरित्या अनिवार्य' नसल्याटी टिप्पणी त्यांनी केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, यावेळी मी फक्त पंतप्रधानांकडूनच वेळ मागितली होती. नेते सध्या पंजाब निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. काम सर्वांत आधी महत्त्वाचं आहे. सोनिया गांधींना मी प्रत्येकवेळी का भेटावं? हे काही घटनात्मकरित्या अनिवार्य नाहीये. असंही त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर काही पत्रकारांनी त्यांना सोनिया गांधींसोबतच्या भेटीबाबत विचारलं. बीएसएफच्या कार्यक्षेतत्राबाबतचा कायदा मागे घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी या भेटीत केल्याचं सांगितलं.
ममता बॅनर्जी यांचे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींसोबत जवळचे संबंध आहेत. परंतु, अलीकडील काही घडामोडींमुळे दोन्ही पक्षांमध्ये काही कारणास्तव राजकीय तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणं असो वा गोव्याच्या राजकारणात तृणमूलने प्रवेश करणे असो, या आणि इतर कारणांमुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मेघालयमध्ये माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह त्यांच्या 17 पैकी 12 आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही महिन्यांत काँग्रेसमधून बाहेर पडू अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.