कर्नाटकात ‘ऑपरेशन कमळ’ला सुरवात

कर्नाटकात ‘ऑपरेशन कमळ’ला सुरवात

बंगळूर - सक्रांतीनंतर राज्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपने हाती घेतलेल्या मोहिमेला मंगळवारी पहिल्या टप्यात यश आले. मात्र, त्यांच्या माघारीचा सरकारच्या अस्तित्वावर कोणताच परिणाम होणार नाही. युती सरकारची तगमग आता वाढली असून काँग्रेस व धजद नेत्यांनीही सरकार टिकविण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. दिल्ली व बंगळुरात साखळी बैठका घेऊन योजना आखण्यात येत आहेत.

पहिल्या टप्प्यात कुमारस्वामी सरकारचा अपक्ष आमदारांमार्फत पाठिंबा काढून घेण्यात भाजपला यश आले. मूळबागीलू मतदारसंघातील अपक्ष आमदार एच. नागेश व राणेबेण्णूर मतदारसंघाचे केपीजेपीचे आमदार आर. शंकर यांनी यांनी युती सरकारला दिलेला पाठिंबा काढून घतल्याचे जाहीर केले. पाठिंबा मागे घेतल्याचे पत्र त्यांनी तयार केले असून ते आज (ता.१६) रीतसर राज्यपालांना सादर करणार आहेत. सदर पत्राच्या प्रती त्यांनी पत्रकारांना दिल्या.

आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार शंकर म्हणाले, ‘संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकार बदलण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. सरकार प्रामाणिक असावे, हीच आमची भूमिका आहे. युती सरकार प्रमाणिक नसल्याने आम्ही पाठिंबा मागे घेत आहोत.’

सध्या दोन्ही अपक्ष आमदार मुंबईत असून त्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली आहे. आज रात्री ते बंगळूरला येणार असून उद्या (ता.१६) युती सरकारचा पाठिंबा मागे घेतल्याचे अधिकृत पत्र राज्यापालांना सादर करणार आहेत.

सरकारला धोका नाही
दोघा अपक्ष आमदारांचा पाठिंबा मागे घेतल्याचा सरकारवर कोणताच परिणाम होणार नाही, सरकार स्थिर व सुरक्षित असल्याचा दावा उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी केला. आमदारांना पैसा व अधिकाराचे अामिष दाखवून सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करीत असल्याचा त्यांनी आरोप केला. काँग्रेसचे राज्य प्रभारी के. सी. वेणुगोपाल तातडीने बंगळूरला आले असून त्यांनी पक्ष नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकार अल्पमतात आल्याचा दावा फेटाळून लावला. काँग्रेसचे सर्व आमदार पक्षाबरोबर असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील आमदारांकडे लक्ष
सध्या माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह सहा आमदार मुंबईत असून ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, चिंचोळीचे आमदार उमेश जाधव, कंप्लीचे आमदार गणेश, मस्कीचे आमदार प्रतापगौड पाटील, यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार, रायचूरचे आमदार बसनगौड दद्दल मुंबईतील हॉटेलमध्ये आहेत. इतर असंतुष्ट आमदारांशी त्यांचा सतत संपर्क असून तेथूनच ते पुढील योजना तयार करत असल्याचे समजते. काँग्रेस नेत्यांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com