'लालटेन'चा जमाना आता गेला; बिहारला मागास ठेवणाऱ्या विरोधकांना दूर ठेवा

Modi in bihar sasaram.
Modi in bihar sasaram.

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी बिहारमधील निवडणुकीसाठी सासारामध्ये आपली पहिली सभा पार पाडली. मोदी आज बिहारमध्ये तीन ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत तर राहुल गांधी देखील दोन ठिकाणी प्रचारसभेत प्रचार करणार आहेत.  पंतप्रधान मोदी राज्यात नितीश कुमारांच्या नेतृत्वाला पुन्हा सत्ता द्या असं आवाहन करण्यासाठी सासाराम, गया आणि भागलपूरमध्ये तीन सभांना संबोधित करणार आहेत. राहुल गांधी भागलपूर जिल्ह्यातील कहलगांवमध्ये आणि नवादा जिल्ह्यातील हिसुआमध्ये दोन वेगवेगळ्या सभांना संबोधित करतील. आज आपल्या पहिल्या सभेत नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. मोदींनी जनतेला आवाहन केलं की त्यांनी बिहारच्या भल्यासाठी नितीश कुमारांना समर्थन द्यावं.

अलिकडेच बिहारने आपल्या दोन पुत्रांना गमावलं आहे ज्यांनी इथल्या लोकांची अनेक वर्षे सेवा केली आहे, असं म्हणून त्यांनी रामाविलास पासवान आणइ रघुवंश  प्रसाद सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली. नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, बिहारच्या लोकांनी आता निश्चय केलाय की, ज्यांचा इतिहास बिहारला खंगून टाकण्याचा आहे त्यांना जवळदेखील फिरकू देणार नाही. बिहारचा विकास आता आणखी गतीने होत आहे. आता बिहारला कुणी मागास आणि अप्रगत राज्य म्हणू शकत नाही. आता 'लालटेन'चा जमाना गेला. राजदच्या कंदील या निवडणूक चिन्हाचा हवाला देऊन त्यांनी टीका केली. 

पुढे ते म्हणाले की, बिहारच्या मातीतील तरुणांनी गलवानच्या घाटीत तिरंग्यासाठी शहीदत्व पत्करलं. मात्र, भारताची मान खाली पडू दिली नाही. पुलवामा हल्ल्यात देखील बिहारचे जवान शहीद झाले. मी त्यांच्या पायावर माथा टेकतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो. देश एकीकडे प्रत्येक संकटाचा सामना करत प्रगती करत आहे तर विरोधक या प्रत्येक प्रगतीच्या आड येत आहेत. देशातील शेतकऱ्यांना मध्यस्थी आणि दलालांपासून मुक्ती देण्याचा मोठा निर्णय सरकारने कृषी कायद्यांतून केला आहे मात्र विरोधक या दलालांची बाजू घेऊन थेट मैदानात उतरले आहेत. जेंव्हा बिहारच्या लोकांनी यांना सत्तेतून बेदखल केलं आणि नितीशजींना संधी दिली तर हे लोक भांबावले. यानंतर त्यांनी दहा वर्षे यूपीए सरकारमध्ये राहून बिहारवर आणि बिहारच्या लोकांवर आपला राग व्यक्त केला. कनेक्टिव्हीटी ही एनडीए सरकारच्या डबल इंजिन सरकारची प्राथमिकता राहिली आहे. आज बिहार्चया जवळपास सर्व गावांपर्यंत रस्ता पोहोचला आहे. नॅशनल हायवे अधिक रुंदावत आहेत. बिहारच्या नद्यांवर आज एकामागोमाग एक नवीन आणि आधुनिक पुल बनत आहेत, असंही त्यांनी म्हटलं. 

नितीश कुमार यांनी यावेळी म्हटलं की, मी आपल्याला आश्वस्त करतो की जर तुम्ही आम्हाला काम करण्याची आणखी एक संधी दिली तर आम्ही प्रत्येक शेतापर्यंत सिंचनाची व्यवस्था करुन देऊ. तसेच प्रत्येक गावांत नव्या टेक्नोलॉजीचा लाभ दिला जाईल, असं नितीश कुमार यांनी म्हटलं. 

मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- बिहारी लोक कन्फ्यूजनमध्ये राहत नाहीत. जेवढे देखील सर्व्हे झाले आहेत त्यात स्पष्टपणे बिहारच्या लोकांनी एनडीएला समर्थन दिलं आहे. 
- बिहारच्या लोकांनी ठरवलं आहे की बिहारला अप्रगत आणि मागास लोकांना जवळही फिरकू देणार नाही. 
- मागच्या सहा वर्षांत बिहारमध्ये वीज तीन पटीने आली आहे. बिहार आता अंधारातून प्रकाशाकडे आला आहे. आता रस्ता-वीज या बरोबरच परिस्थिती देखील बदलली आहे. 
- आधी गरीबांचं धान्य रेशन दुकानात लुटलं जायचं. कोरोना काळात गरीबांना धान्य मोफत दिलं गेलंय.
 - नितीशजींच्या नेतृत्वात बिहारच्या विकासाचे काम गतीने होईल. गरीब, वंचित आणि दलितांना कोणत्याही भेदभावाशिवाय आता घर, पाणी आणि वीज मिळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com