
कोरोना काळात सरकारकडून मोठी घोषणा; 80 कोटी लोकांना लाभ
नवी दिल्ली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गंत कोट्यवधी लोकांना 5 किलो धान्य मोफतमध्ये दिले जाणार आहे. महामारीमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शिवाय गरीब लोकांना याकाळात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे जवळपास 80 कोटी गरिबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यामध्ये मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. 2020 मध्ये लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही गरिबांसाठी मोफत धान्याची योजना आणण्यात आली होती.
हेही वाचा: पंतप्रधान मोदी होणार 'क्लायमेट समिट'मध्ये सहभागी; बायडन यांनी दिलेलं निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याण योजनेंतर्गत 80 कोटी लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे. केंद्र सरकार या योजनेसाठी 26 हजार कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं की, देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अशा परिस्थितीत गरीब लोकांना अन्नधान्य पुरवणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 2020 ला जूनमध्ये पाच महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती. देश लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये प्रवेश करताना पंतप्रधान मोदी यांनी ही योजना जाहीर केली होती. यासाठी जवळपास 90 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
हेही वाचा: 'महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती, पण मोदी लावणार नाहीत'
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. या काळात मजूर लोकांचे प्रचंड हाल झाले. अनेकांना आपल्या गावाकडे स्थलांतर करावे लागले. अनेकांनी आपल्या घरी जाण्यासाठी 400 ते 500 किलोमीटर अंतर कोणत्याही सुविधेशिवाय पायी चालून पार केल्याचं पाहायला मिळालं. सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले. अशावेळी मदत म्हणून केंद्र सरकारकडून मोफत अन्नधान्य पुरवण्यात आले होते.
Web Title: Pm Narendra Modi Govt To Provide Free Food To 80 Crore Poor In May
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..