दिल्लीतील प्रदूषण पुन्हा घातक पातळीवर; शाळा बंद ठेवण्याची सूचना

दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील (एनसीआर) वायू प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले.
delhi-air-pollution
delhi-air-pollutionsakal
Summary

दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील (एनसीआर) वायू प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले.

नवी दिल्ली - दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील (एनसीआर) वायू प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले असून वायू गुणवत्ता सूचकांक (एक्यूआय) ४०० ते ५०० च्या म्हणजे अतीगंभीर स्थितीत पोहोचला आहे. दिल्लीच्या हवेतील ‘स्मॉग' चा विळखा घट्ट झाला असून नागरिकांना कालपासून श्वास घेणेही कठीण झाले आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) दिल्ली सरकारला प्रदूषणाची परिस्थिती सुधारेपर्यंत शाळा बंद ठेवण्याची सूचना केली आहे. आयोगाने दिल्ली सरकारला नोटीस पाठवून २४ तासांत उत्तर मागितले आहे. एकूण परिस्थिती पहाता पुढील आठवडाभर शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्मय दिल्ली सरकारकडून कधीही घोषित होऊ शकतो.

दिवाळीत प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढविणाऱया फटाक्यांच्या आतषबाजीवर निर्बंध आणणाऱया दिल्ली सरकारवर टीका करणाऱया भाजप नेत्यांनीही प्रदूषणाच्या विषारी विळख्याबद्दल आप सरकारवर आरोप केले आहेत. दुसरीकडे भाजप खासदार वरूण गांधी यांनीही, फटाक्यांच्या धुरामुळे वाढलेल्या प्रदूषणाचा उल्लेख करून, ‘आपल्याच लोकांना विष देण्याचे वार्षिक प्रकार बंद व्हायला हवे,' या शब्दांत घरचा आहेर दिला आहे. दिल्लीवरील या वार्षिक संकटावर ठोस उपाययोजना सापडत नसताना, भाजप आणि आप यांच्यातील राजकीय कलगीतुऱयालाही नेहमीप्रमाणे उत आला आहे.

एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी सांगितले की दिल्लीतील प्रदूषणाच्या चिंताजनक पातळीवर पोहोचले असून, या वातावरणात शाळकरी मुलांची सुरक्षा ही चिंताजनक गोष्ट आहे. शाळा बंद ठेवण्याबाबत दिल्ली सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. प्रदूषणाची चिंताजनक पातळी असूनही, दिल्लीत अजूनही शाळा सुरू आहेत, त्यासंदर्भात आयोगाने दिल्ली सरकारला नोटीस पाठवली आहे.

दरम्यान भाजपने मुलांना वायू प्रदूषणापासून वाचवण्यासाठी शारिरीक वर्गांसाठी शाळा बंद करून ऑनलाइन शिक्षण घेण्याची मागणी केली आहे. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही के सक्सेना यांना लिहिलेल्या पत्रात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी म्हटले आहे की दिल्लीतील प्रदूषण अत्यंत गंभीर पातळीवर पोहोचल्यामुळे शालेय मुलांवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे. मोकळ्या मैदानात किंवा घराबाहेर अशा तीव्र प्रदूषणात पाठवल्याने मुले मोठ्या संख्येने श्वसन विकारांनी ग्रस्त आहेत.

भाजप नेते विजय गोयल यांनीही दिल्लीतील जीवघेण्या प्रदूषणासाठी आप सरकारला जबाबदार धरताना, जंतरमंतर वर एका दिवसाच्या उपवास आंदोलनाचा इशारा दिला. गोयल यांनी चक्क अण्णा हजारे यांचे छायाचित्र ठेवून त्यासमोर हे आंदोलन करण्याचे जाहीर केले. आम आदमी पक्षाचा जन्म हजारे यांच्याच आंदोलनातून झाला हा संदर्भ या आंदोलनाला आहे. हजारे यांचे नाव सांगून राजकारणात व सत्तेत आलेल्या केजरीवाल सरकारच्या काळात दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषीत शहर व यमुना सर्वांत गलिच्छ नदी बनली असाही आरोप गोयल यांनी केला.

वरूण यांचा आरोप

भाजप खासदार वरुण गांधी यांनी राष्ट्रीय राजधानीतील वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करताना प्रदूषणाच्या संकटाशी निगडित सरकारी यंत्रणांमधील चिंता आणि समन्वयाच्या अभावावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्लीतील रूग्णालये श्वास, हृदय आणि फुफ्फुस विकारांच्या रूग्णांनी रुग्णालये भरलेली आसताना सरकार किंवा जनताही या जीवघेण्या समस्येबद्दल गंभीर नाही. गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की दिल्ली-एनसीआरमधील १० पैकी ८ मुलांना श्वसनाचा त्रास आहे. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर तणे जाळण्याच्या आणि फटाक्यांच्या वापराच्या घटना वाढल्या. असे करून आपल्याच लोकांना विष देण्याची प्रथा बंद झाली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com