नवी दिल्ली - सध्या कोरोनाने भारतात धुमाकूळ घातला आहे. दरदिवशी देशात 80 ते 90 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्ण जेव्हा बरा होतो त्यानंतर काय करावं यासाठी पोस्ट कोविड 19 मॅनेजमेंट प्रोटोकॉल जारी केला आहे. त्यामध्ये कोरोना झाल्यानंतर रुग्णाला कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं. कोरोनातून ठणठणीत झाल्यावर कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत काही सूचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत.
वैयक्तिक पातळीवर कोणत्या गोष्टींची काळजी नागरिकांनी घ्यायला हवी याची माहिती देण्यात आली आहे. आहार विहाराबाबत सांगताना च्यवनप्राशन खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच योगासने, प्राणायम, आणि चालण्याचा सल्ला दिला आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाळण्यात येणारे सर्व नियम यामध्ये लागू असतील. त्यात सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हँड सॅनिटायझरचा वापर करणं याचा समावेश आहे. गरम पाणी प्यावं असंही यामध्ये सांगितलं आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती महत्वाची असून त्यासाठी आयुष मेडिसिनचा वापर करावा. याबाबत आयुषच्या डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्यावीत असंही सांगण्यात आलं आहे. याशिवाय व्यायाम करावा असंही यामध्ये म्हटलं आहे. दररोज योगासने, प्राणायम आणि ध्यानसाधना करण्याचा सल्ला दिला आहे. श्वसनाचे व्यायाम, दररोज सकाळी किंवा संध्याकाळी झेपेल इतका चालण्याचा व्यायाम करावा.
प्रोटीनयुक्त आहार, ताजं आणि हलकं जेवण, पुरेशी झोप आणि आराम शरीरासाठी उपयुक्त ठरेल. तसंच प्रकृतीसाठी धोकादायक असलेलं धुम्रपान आणि मद्यपान टाळावं. कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती तयार करणारी औषधे आणि इतर आजार असतील तर त्याची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. याशिवाय रुग्णांनी घरी आपल्या प्रकृतीची तपासणी करावी. यामध्ये ताप, रक्तदाब, ब्लड शुगर, पल्स रेट वेळोवेळी तपासून घ्यावा. कोरडा खोकला, घशात त्रास होत असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या किंवा गरम वाफ घ्यावी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.