नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या समर्थनार्थ आता काँग्रेस नेते राहुल गांधीही उतरले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय.
काय म्हणाले राहुल गांधी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावमी संचालनालयाने नोटिस पाठविली. यावरून मोठे राजकीय वादळ उठले आहे. विरोधीपक्षांनी याप्रकरणी सत्ताधारी भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. आता राहुल गांधी यांनीही यावरून भाजपला लक्ष्य केले आहे. यासंदर्भात राहुल यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. सुडाच्या भावनेने पेटलेल्या सत्ताधाऱ्यांकडून लक्ष्य झालेले, शरद पवार हे आणखी एक ताजे उदाहरण आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय संधीसाधूपणा आपल्याला दिसत आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
‘कायदा सुव्यवस्था ही तर पोलिसांची जबाबदारी’
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकार आणि पोलिसांवर दबावाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. मुंबईत आज, शरद पवार ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहणार आहेत. यापार्श्वभूमीर राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. या कार्यकर्त्यांना वाशी, मुलुंड, चेंबूर येथे अडविण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. ‘आम्ही भारतीय असून, आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे. आम्ही गांधी विचारांना मानत असून, त्या मार्गानेच आंदोलन करत आहोत.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहे. तसेच कायदा सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, आम्ही आजवर कधीही हिंसक मार्गाने आंदोलन केलेले नाही. आम्ही फक्त आमच्या नेत्याला पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.