भारतीय रेल्वेच्या दररोज एक हजार ४९० मेल आणि एक्स्प्रेस गाड्या आणि पाच हजार ३९७ उपनगरी गाड्या धावत आहेत.
नवी दिल्ली - कोणत्याही राज्याला रेल्वेसेवा थांबविण्यास सांगितलेले नाही. सर्व रेल्वे स्थानकांवर कोविड नियमांचे पालन करण्यात येत असून, आवश्यक तेथील स्थानकांवर प्रवाशांच्या कोविड चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘प्रवाशांना तिकिटासाठी स्थानकांवर यावे लागू नये म्हणून ई तिकीट सुविधा आहे. तसेच प्रवास करायचा असेल, तर आरटी-पीसीआर चाचणी आणि कोविड संसर्ग नसल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगण्याची सूचना करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी चिंताजनक स्थिती आहे, तेथे राज्य सरकारबरोबर चर्चा केली जात आहे. जेथे कंटेन्मेंट झोन आहे, तिथे रँडम चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, कुठेही रेल्वेसेवा थांबविण्याची सूचना करण्यात आलेली नाही.’’
‘‘रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर वाढविण्यात आला आहे. प्रत्येक स्थानकावर प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. कोविड नियमांचे पालन केले नाही, तर दंड आकारणी केली जात आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.
मुंबई, गुजरात, कर्नाटक आणि जिथे रेल्वेची मागणी आहे, तिथे आम्ही लक्ष ठेऊन आहोत. गरज भासेल, तशा जादा रेल्वेगाड्या सुरू करण्याचे अधिकार विभागीय व्यवस्थापकांना दिले आहेत. त्यामुळे गाड्याची कमतरता नाही, सेवेत खंड नाही. विशेषतः: मुंबई, सुरत आणि बंगळूर येथे परिस्थिती सुरळीत आहे. भारतीय रेल्वेच्या दररोज एक हजार ४९० मेल आणि एक्स्प्रेस गाड्या आणि पाच हजार ३९७ उपनगरी गाड्या धावत आहेत. देशातील प्रवाशांची वाढलेली संख्या पाहता १४० जादा गाड्या देण्यात आले आहेत, असा दावा शर्मा यांनी केला आहे.
नंदूरबारला विलगीकरण कोच
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी सांगितले की, देशात विविध ठिकाणी आमचे कोरोना विलगीकरण कोच आहेत. नंदुरबारहून २० विलगीकरण कोचची मागणी आली होती, ते त्यांना देण्यात आले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.