Rajasthan Vidhansabha Election : लढत ‘टोंक’दार, पायलट दमदार!

टोंकच्या बालेकिल्ल्यातून यंदा सचिन पायलट हे सलग दुसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. मागील खेपेस भाजपच्या युनूस खान यांच्यासारख्या तगड्या उमेदवारासोबतची झुंज त्यांनी जिंकली होती.
sachin pilot and ajitsinh
sachin pilot and ajitsinhsakal

टोंक - टोंकच्या बालेकिल्ल्यातून यंदा सचिन पायलट हे सलग दुसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. मागील खेपेस भाजपच्या युनूस खान यांच्यासारख्या तगड्या उमेदवारासोबतची झुंज त्यांनी जिंकली होती. याखेपेस मात्र पायलट यांच्यासमोर फार मोठे आव्हान नाही.

अजित मेहतांसारखा स्थानिक उमेदवार देऊन भाजपने जोडीला ध्रुवीकरणाचा खेळ सुरू केला असला, तरीसुद्धा गुर्जर आणि मुस्लिम मतपेढी फुटणे तितकेसे सोपे नाही. अखेरच्या टप्प्यात बहुजन समाज पक्षानेही काँग्रेसला पाठिंबा देऊ केल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे.

राज्यात आणि प्रत्यक्ष शहरातही काही पक्ष आणि संघटनांकडून सुरू असलेला फूट पाडण्याचा उद्योग या अल्पसंख्याकबहुल मतदारसंघाला फारसा रुचलेला दिसत नाही. त्यामुळे ओवेसींचा एमआयएम असो किंवा चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाबाबत येथील स्थानिक मुस्लिम सावध असल्याचे दिसून येते.

‘टोंक हमारी सीट है, इस शहर को नवाबोंने बनाया. अब जो लोग पॉवर बैठे है, उन्होने देश को पोलराइज कर दिया है... अगर यहाँ से हमारा कॅंडिडेट खडा रहता, तो यहाँ भी हिंदू- मुस्लिम राजनीती होती. लेकिन हम लोगोंने अब पायलट साब के साथ खडा होना पसंत किया है,’ साठी ओलांडलेले सय्यद मेहमूद शाह सांगत होते. कधीकाळी कर्मचारी महासंघाचे नेतृत्व केलेल्या शाह यांनी सध्या स्वतःला काँग्रेसच्या प्रचारात झोकून दिलंय.

म्हणून काँग्रेस हवी

काँग्रेसनं आम्हाला फार काही दिलेलं नाही पण त्यांनी किमान आमचं अस्तित्व तरी मान्य केलं? हेच आमच्यासाठी खूप आहे, असा सूर काही स्थानिक मुस्लिम नेते मंडळींकडून ऐकायला मिळाला. मुस्लिम, गुर्जर आणि बेरवा या दलित घटकांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघाने आतापर्यंत काँग्रेसला साथ दिली आहे. यंदाही येथे पायलटच जिंकतील, असा दावा जाणकार करताना दिसतात. भाजपच्या मेहता यांना अल्पसंख्याक आणि गुर्जर समुदायाची मते मिळण्याची शक्यता कमीच आहे.

रेल्वे सेवेची प्रतीक्षा

सत्ताधारी काँग्रेसचा बालेकिल्ला अन् त्यातही पायलट यांचा मतदारसंघ असूनही टोंकला म्हणावी तशी प्रगती साधता आलेली नाही. येथे रेल्वे नसल्याने उद्योगांना चालना मिळत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. येथेही विडी उद्योग आणि मोलमजुरी करूनच अनेकांना उदरनिर्वाह करावा लागतो. सवाई माधोपूर ते अजमेर या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, पण केंद्राकडून फाइल हालत नसल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला.

मुस्लिमांचेही योगदान मोठे

‘केंद्रात उजव्या विचारधारेचे सरकार आल्यापासून अभ्यासक्रमातून इस्लामी इतिहास वगळला जातोय. नव्या शैक्षणिक धोरणात तर जाणीवपूर्वक तसे करण्यात आले आहे,’’ अशी भावना आसिफ खान यांनी व्यक्त केली. ‘‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांचेही तितकंच मोठं योगदान आहे, मुस्लिम नायकांना वगळून नेमका काय संदेश देणार आहोत?’ असा सवालहीकेला.

दरम्यान, टोंक जिल्ह्यात चार मतदारसंघ आहेत. मालपुरा, देवली- उनियारा, निवाई आणि प्रत्यक्ष टोंक शहर यांचा समावेश होतो. याखेपेस येथून ३७ उमेदवार मैदानात उतरले आहेत.

संशोधन केंद्राचा ऐतिहासिक वारसा

टोंक येथील मौलाना अबुल कलाम आझाद अरबी, फारसी शोध संस्थेने टोंकचा प्राचीन इस्लामी वारसा जपलाय. जगातील सर्वांत मोठे कुरआन येथेच पाहायला मिळते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे अभ्यासक, विद्यार्थी आणि पर्यटक जाणीवपूर्वक या केंद्राला भेट देतात. ऐतिहासिक हस्तलिखिते, नवाबकालीन नाणी, अरबी, फारसी आणि मध्ययुगीन साहित्याचा मोठा संग्रह या संशोधन केंद्रामध्ये आहे.

चोवीस तास हिंदू- मुस्लिम राजकारण आम्हाला नकोय. आमच्या पिढीचे पोटाचे प्रश्न मोठे आहेत, निवडून कुणीही येवो पण त्याने आधी येथे रोजगार आणावेत एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे.

- आसिफ अन्सारी, स्थानिक तरुण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com