जयपूर - ‘राजस्थानमधील नागरिकांना महागाईपासून मुक्तता देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून ते यशस्वी होत आहेत. आता २०३०पर्यंत राजस्थान हे देशातील आघाडीचे आणि सर्वोत्तम राज्य करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. त्यासाठी समाजातील सर्वच वर्गांतील नागरिकांचे सहकार्य हवे आहे,’ असे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी येथे केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त सवाई मानसिंह स्टेडिअमवर राज्यस्तरीय कार्यक्रमात गेहलोत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यावर ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘राजस्थानात १७ नवे जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण ५० जिल्हे झाले आहेत. तसेच राजीव गांधी क्रीडा स्पर्धा ही देशातीलच नव्हे तर, जगातील एक मोठी स्पर्धा असून त्यात सुमारे ६० लाख खेळाडू भाग घेत आहेत. त्यातूनच भविष्यात आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार होतील.’
सामाजिक सुरक्षिततेसाठीच्या योजना राबविणाऱ्या ‘राजस्थान मॉडेल’ची आता देशभर प्रशंसा होत आहे. विविध प्रकारच्या १० योजना गरिबांसाठी उपकारक ठरत आहेत. त्यासाठी एक कोटी ९५ लाख पैकी १ कोटी ८२ लाख कुटुंबांनी नोंदणी केली आहे. जनतेकडून गोळा होणाऱ्या कराची रक्कम जनतेसाठीच खर्च करण्यात येत आहे.
कोरोनाच्या काळात राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे राजस्थानात कोरोना मर्यादित राहिला. राजस्थान सरकारचा कारभार हा विश्वस्त पद्धतीने होत असून शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांद्वारे राज्याला आघाडीवर नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची तसेच आगामी योजनांचीही माहिती मुख्यमंत्री गेहलोत यांनी यावेळी दिली. या प्रसंगी राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी, माजी शिक्षण राज्यमंत्री गोविंदसिंह डोटासरा, मुख्य सचिव उषा शर्मा यांच्यासह अनेक अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.