कृत्रिम बुद्धिमतेच्या विकासात भारत पिछाडीवर

कृत्रिम बुद्धिमतेच्या विकासात भारत पिछाडीवर

नवी दिल्ली  - सध्याच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमतेची (एआय) चर्चा आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमतेच्या (एआय) विकासात भारताची कामगिरी निराशाजनक असून देशाला त्यासाठी जलद कार्यक्रम आखण्याची गरज आहे, असे मत संशोधक राजीव मल्होत्रा यांनी आपल्या नव्या पुस्तकात केला आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲंड द फ्युचर ऑफ पॉवर ः ५ बॅटलग्राऊंड्‌स’ असे त्यांच्या या पुस्तकाचे नाव आहे. 

कृत्रिम बुद्धिमतेच्या क्रांतीमुळे भारतासारख्या देशावर तसेच मानवतेच्या विविध घटकांवर असमान परिणाम होत आहे. भारतात लोकसंख्येच्या मोठ्या भागात यासंदर्भातील शिक्षणाचा अभाव असून तंत्रज्ञानाच्या सुनामीत तग धरण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. अन्यथा, त्याचे धक्कादायक दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा मल्होत्रा यांनी दिला आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विजेते आणि पराभूत हे वर्गच नसतील. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातील संघर्ष असेल. त्यामुळे सत्ता आणि पैशाचे अभूतपूर्व केंद्रीकरण होईल. त्याचप्रमाणे अभूतपूर्व बेरोजगारी निर्माण होईल. त्यातून, सामाजिक अस्थिरतेत भर पडेल, असा दावाही त्यांनी केला आहे. 

मल्होत्रा यांच्या मते, भारत एखाद्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या रणभूमीसारखा असल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव जाणून घेण्यासाठी तो महत्त्वाचा ठरतो. भारतीय समाजाला अमेरिकीकरणातील ‘अर्थ’ (भौतिक सुख) व ‘कर्म’ (वैषयिक तृप्ती) यांचा पाठलाग करताना आपल्या संस्कृतीतील धर्मातील तत्वज्ञानविषयक मुळांचा विसर पडला. परिणामी, भारतीय समाज मध्येच अधांतरी लटकला. समाजाने वैयक्तिक तसेच सामुदायिकरित्या आपली पारंपरिक शक्ती गमावली. भारतीय समाजाने अमेरिकी स्वप्नांचे केविलवाणे अनुकरण केले. त्यात लोकसंख्या, बेरोजगारी आणि खराब शिक्षणामुळे भारताची स्थिती अधिकच बिघडली. देशातील बहुतेक उद्योग आयात तंत्रज्ञानावर अवंलबून आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

ते पुढे म्हणाले, की मी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेचा वापर केवळ तंत्रज्ञानाच्या संदर्भात करत नाही तर ती जिची शक्ती अनेकपटींने वाढविते, त्या पूर्ण प्रणालीचा यात समावेश आहे. त्यात क्वांटम कॉम्युटिंग, सेमीकंडक्टर्स, रोबोटिक्स, ५ जी आदींचा समावेश होतो. 

कृत्रिम बुद्धिमतेत भारत चीनपेक्षा किमान दशकाने मागे आहे. याशिवाय, नेत्यांच्या दुर्लक्षामुळे देश नियमितपणे आपली अद्वितीय डेटा संपत्ती परकीय देशांना देत आहे. हाच क्रम सुरू राहिल्यास भारत अमेरिका किंवा चीनची डिजिटल वसाहत होईल. 
राजीव मल्होत्रा, संशोधक 

महत्वाची निरीक्षणे 
देशाला कृत्रिम बुद्धिमतेचा जलद कार्यक्रम आखण्याची गरज 
लोकसंख्या, बेरोजगारीमुळे परिस्थिती बिघडली. 
सत्ता आणि पैशाचे अभूतपूर्व केंद्रीकरणाची शक्यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com