कर्नाटकातील आघाडी सरकार वाचवा; राहुल गांधींच्या सूचना

Rahul Gandhi
Rahul Gandhi

बंगळूर, ता. 31 : कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडी सरकार अडचणीत येता कमा नये, सरकार टिकवून ठेवा, अशी स्पष्ट सूचना कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कॉंग्रेस नेत्यांना केली. समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली व राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. 

"सिद्धरामय्या हेच आमचे मुख्यमंत्री,' असे कॉंग्रेसच्या काही आमदारांनी वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. यावरून कॉंग्रेस व जेडीएसमध्ये मतभेद वाढले असून, दुरावा निर्माण झाला आहे. जेडीएस आमदारांकडून कॉंग्रेस नेत्यांवर टीका होत आहे. त्यामुळे युती सरकारच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

सिद्धरामय्या यांनी वेणुगोपाल यांच्यासमवेत राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा केली. राहुल यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती घेतली. राज्यातील युती सरकारमध्ये कोणताच गोंधळ निर्माण करू नका. सरकार कोणत्याही परिस्थितीत पतन होता कामा नये, असे त्यांनी सिद्धारामय्या यांना स्पष्ट बजावले. 

भाजप आणणार अविश्‍वास ठराव 
सरकारमधील गोंधळाचा लाभ उठविण्यासाठी भाजपने अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारविरुद्ध अविश्‍वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. अविश्‍वास ठरावाच्या माध्यामातून युती सरकारला अडचणीत आणून अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कॉंग्रेसपासून दुरावलेले असंतुष्ट आमदार रमेश जारकीहोळी, महेश कुमठळ्ळी, डॉ. उमेश जाधव व बी. नागेंद्र भाजपाच्या वाटेवर आहेत. आमदारांकडून राजीनामा घेऊन पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी अविश्‍वास ठरवावर असंतुष्ट आमदारांचे क्रॉस मतदान किंवा त्यांना अनुपस्थित ठेवल्यास सरकारचे पतन होईल, असा भाजपचा विचार आहे. 

सरकारविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल करायचा झाल्यास 14 दिवस आधीच सभाध्यक्षांकडे नोटीस द्यावी लागते. दोन दिवसांत विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार किंवा सचिवांची भेट घेऊन नोटीस देण्यात येणार असल्याचे समजते. विधानसभेच्या एकूण 224 सदस्यांपैकी युती सरकारला 118 आमदारांचा पाठिंबा आहे. अपक्ष आमदार आर. शंकर व नागेश यांनी भाजप सरकारला पाठिंबा देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 104 वरून 106 वर पोचले आहे. कॉंग्रेसमधील असंतुष्ट चार आमदारांनी राजीनामा दिल्यास सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या 114 पर्यंत कमी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com