शाहीन बाग बरकरार है! आंदोलकांना मध्यस्थीकारांचे भावनिक आवाहन

Shaheen-Bagh-Delhi
Shaheen-Bagh-Delhi

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून शाहीन बाग येथे सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे येथील मुख्य रस्ताही दोन महिन्यांपासून बंद आहे. तो वाहतुकीसाठी खुला व्हावा, यासाठी हरप्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. या कामी सुप्रीम कोर्टाने वकील संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन या दोन मध्यस्थीकारांची नेमणूक केली आहे. 

आज सलग दुसऱ्या दिवशी हे दोन्ही मध्यस्थीकार शाहीन बाग येथील आंदोलकांच्या भेटीस गेले. मात्र, आंदोलन मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दर्शविला. तेव्हा शाहीन बाग अबाधित होती आणि यापुढेही कायम राहील. तुम्ही शाहीन बाग व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणीही आंदोलन करू शकता, असे आवाहन केल्यानंतरही आंदोलक आपल्या निर्णयावर ठाम राहिले. यानंतर मध्यस्थीकार शुक्रवारी (ता.२१) आंदोलनस्थळी जाणार असून १०-१५ महिलांच्या गटांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. 

हा विषय सुप्रीम कोर्टात गेला तर...

मध्यस्थीकार वकील संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन यांनी आंदोलकांना त्यांचे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ''तुमचे म्हणणे आणि वेदना जाणून घेण्यासाठीच आम्ही आलो आहोत, पण जर यातून तोडगा काढण्यात अपयश आले तर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाईल. आणि त्यानंतर कोणताही दुसरा पर्याय राहणार नाही. आणि सुप्रीम कोर्टाने सरकारला आदेश दिल्यावर आम्हीही काही करू शकणार नाही.'' 

रामचंद्रन पुढे म्हणाल्या की, अशी कोणती समस्या नाही ज्यावर तोडगा काढता येत नाही. जर आपण चांगले आणि प्रामाणिक नागरिक आहोत आणि यातून मार्ग काढण्यासाठी तयार आहोत, तर शाहीन बागही अबाधित राहील आणि यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कोणतीही नाही. तसेच भविष्यकाळात शाहीन बाग हे उत्तम आंदोलनाचे उदाहरण म्हणूनही पुढे येईल. 

मध्यस्थीकारांनी आंदोलकांना दुसऱ्या ठिकाणी आंदोलन करण्याचा सल्ला दिल्यावर आंदोलकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. 'तुम्हाला आंदोलन करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणीही तुम्ही आंदोलन करू शकता,' असे हेगडे यांनी म्हटले होते. त्यामुळे तेथे गदारोळ माजला होता. 

आंदोलनस्थळी विविध माध्यमांचे प्रतिनिधी दाखल झाले आहेत. त्यामुळे आंदोलकांचे बळ वाढले आहे. मात्र, माध्यमे ही फक्त आंदोलन कव्हर करण्यासाठी आली आहेत. ते याप्रकरणी सल्ला देऊ शकत नाहीत. आणि त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. जर माध्यम प्रतिनिधी शाहीन बागेतून बाहेर गेले तर याप्रकरणी लवकर तोडगा निघू शकतो, असे रामचंद्रन म्हणाल्या. मध्यस्थीकारांशी काहीजण गैरवर्तणूक करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com