
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये आणखी तेरा जणांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या ७४ वर पोचली आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकून पडले असून, त्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयानेही लोकांनी आवश्यक असेल तरच प्रवास करावा, अशी सूचना केली आहे.
नव्याने विषाणूचा संसर्ग झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील नऊ, दिल्ली, लडाख आणि उत्तर प्रदेशातील एक आणि एका परकी नागरिकाचाही समावेश असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, कोरोनाबाधित इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकून पडले असून, त्यांना मायदेशी आणण्यासाठी तीन विमाने पाठविली जाणार असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत बोलताना सांगितले. या अडकून पडलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमधील एक हजार यात्रेकरूंचा समावेश आहे. या विषाणूंच्या प्रसाराचा वेग लक्षात घेता भारतीयांनी आहे तेथेच थांबावे अशी सूचना परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. आयपीएल रद्द करण्याची सूचनाही मंत्रालयाने केली असून अंतिम निर्णय मात्र आयोजकांनी घ्यावा, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
लसीसाठी दीड ते दोन वर्षे लागणार
आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या चाचणीसाठी देशभर पुरेशा प्रयोगशाळा असल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणूंना वेगळे पाडण्यात आम्हाला यश आले असून या विषाणूंविरोधातील लस येण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षांचा अवधी लागेल, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे. भारतात सुदैवाने या विषाणूचा एका समुदायाकडून दुसऱ्याकडे प्रसार होताना दिसत नाही. भारतातही केवळ बाहेरून आलेल्यांमुळेच हा विषाणू पसरला असून एका व्यक्तीकडून तिच्या अन्य कुटुंबीयांना या विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले.
राजधानी दिल्लीमध्ये राज्य सरकारने सरकारी आणि खासगी कार्यालये निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश दिले असून, ३१ मार्चपर्यंत सिनेमागृहेदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकार तीन विमाने पाठविणार
देशातील बाधितांची संख्या ७४ वर
अनावश्यक प्रवास टाळावा लागणार
कोरोनाच्या विषाणूचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून, याला रोखण्यात आधीच आपल्याला खूप उशीर झाला आहे. याच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारने उपाययोजना आखाव्यात.
- राहुल गांधी, नेते, काॅँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.