नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आचारसंहितेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातील संवाद सरकारच्या योजनांऐवजी दहावी, बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छांपुरताच मर्यादित ठेवला. "स्माईल मोअर, स्कोअर मोअर', असा शुभेच्छा संदेश मोदींनी विद्यार्थ्यांना दिला.
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांत होणार असून, आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे सरकारने मोदींच्या "मन की बात' कार्यक्रम सादरीकरणासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. तर आयोगानेही, पाच राज्यांमधील मतदारांना प्रभावित करणारे भाष्य करू नये, या अटीवर रेडिओ कार्यक्रमाला परवानगी दिली. त्यानंतर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या वर्षातील पहिल्या "मन की बात'मध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे हौतात्म्य आलेल्या जवानांप्रती आदरांजलीही अर्पण केली.
जीवनातील यशापयशाशी परीक्षेचा काहीही संबंध नसल्याचे सांगताना पंतप्रधान मोदींनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे, तर घरात परीक्षेच्या काळात उत्सवाचे वातावरण ठेवावे, अशी सूचनाही त्यांनी पालकांना केली.
ते म्हणाले, की संपूर्ण कुटुंबाने हा उत्सव साजरा करण्यात आपापली भूमिका पार पाडल्यास बदल घडून येईल. जेवढा आनंदाने हा काळ घालवाल तेवढे अधिक गुण मिळतील. परीक्षा म्हणजे एक आनंददायी संधी असायला हवी. खूप कमी जणांसाठी परीक्षा म्हणजे आंनदोत्सव असतो, तर बहुतांश जणांसाठी दबाव असतो. त्यामुळे आनंद साजरा करायचा की ताण सहन करायचा, याचा निर्णय विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे.
हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करा
वह्या- पुस्तकांच्या मदतीने दिलेल्या परीक्षेखेरीज जीवनात इतरही अनेक परीक्षांचे प्रसंग येतील, त्यामुळे या परीक्षांचा आणि जगण्यातील यशापयशाचा काहीही संबंध नाही. त्यासाठी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे उदाहरण प्रेरणादायक असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्याचप्रमाणे नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यावर भर देताना मोदींनी 30 जानेवारीला महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचेही आवाहन केले.
|