चेन्नई (तमीळनाडू) : नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाचे केंद्र आता उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकू लागले आहे, चेन्नईतील जुन्या वॉशरमनपेट परिसरामध्ये आंदोलक आणि पोलिस यांच्यात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार धुमश्चक्रीनंतर आता राजकीय पक्षांमध्येही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. राज्यातील सर्वच विरोधी पक्षांनी आंदोलकांवरील पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा निषेध केला आहे. आज दुसऱ्या दिवशी चेन्नईतील आंदोलनाचे पडसाद राज्याच्या अन्य भागांमध्येही उमटले.
पोलिसांनी मात्र आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतरच आम्ही त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला. द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध केला असून राज्य सरकारने कट आखून आंदोलकांवर हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंदोलक शुक्रवारी रात्री शांततेत आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला केला. आताही पोलिसांनी अटक झालेल्यांची तातडीने सुटका करत त्यांच्यावरील सर्व खटले मागे घ्यावेत अशी मागणी स्टॅलिन यांनी केली. दरम्यान चेन्नईमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ल्याचे वृत्त समजताच तमिळनाडूतील अन्य शहरांमध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. त्रिची, मदुराई, कोइमतूर, पोलाची आणि अन्य शहरांमध्ये आंदोलकांनी रस्त्यांवर उतरत सरकारच्या कारवाईचा निषेध केला.
राज्यातील अम्मा सरकारने नेहमीच मुस्लिमांच्या कल्याणास सर्वोच्च प्राधान्य दिले असून मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी अल्पसंख्याकांचा मुलाप्रमाणे सांभाळ केला आहे.
- आर. बी. उदयकुमार, महसूलमंत्री तमिळनाडू
विरोधकांची टीका
अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघमचे नेते टी.टी.व्ही. दिनकरन, एमडीएमकेचे वैको यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली असून भाजपचे नेते एच. राजा यांनी मात्र आंदोलनादरम्यान हिंसा करणाऱ्यांवर टीका केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.