जयपूर : कोरोना विषाणूच्या थैमानामुळे जगभरात सध्या भितीचे वातावरण आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी आपण जनता कर्फ्यूनंतर आजही लॉकडाउनमध्ये आहे. सर्वत्र कोरोनाचे संकट घोंगावत असताना राजस्थानमध्ये आता आणखी एका संकटाने डोकेवर काढले आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चक्क कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानमधील चूरु येथील तापमानाने उच्चांक पातळी गाठली आहे. येथील तापमान 47 डिग्री सेल्सिअसवर पोहचले असून कडक उन्हामुळे रस्ते मोकळे मोकळे झाल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यावरील सन्नाटा हा कर्फ्यूची आठवण करुन देणारा असाच होता.
वाढलेल्या तापमानामुळे वाहणारी गरम हवा, अंगावर चटके जाणवतील इतके उन्ह यामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले. परिणामी शुक्रवारी दुपारनंतर चूरूमध्ये कर्फ्यूचा माहोल दिसून आला. सध्याच्या घडीला चौथ्या टप्प्यातील देशव्यापी लॉकडाउन सुरु आहे. 4 नंतर दुकाने खुली करण्याची शिथीलता असतानाही अनेक दुकाने बंद दिसली. चूरू हवामान खात्याने यापूर्वी 46.6 डिग्री इतक्या सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी यात आणखी भर पडून चूरुमध्ये तापमनाने नवा विक्रम प्रस्थापित केला.
राजस्थानमधील पश्चिम आणि पूर्व भागातील काही ठिकाणी पुढील तीन दिवसांत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 25 मेला रोहिणी नक्षत्र लागणार असून त्यानंतर 9 दिवस तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी चूरुमध्ये 50 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. सध्याची परिस्थिती पाहता मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक तापमानाची नोंद होण्याचे संकेत मिळत आहेत. श्रीगंगानगरमध्ये तापमानाने उच्चांक गाठल्याचे वृत्त आहे. याठिकाणी पारा 46 डिग्री सेल्सियसहून अधिक नोंदवला गेलाय. गुरुवारी याठिकाणी 44.8 इतके तापमान होते. शुक्रवारी ते 46.6 वर गेल्याचे पाहायला मिळाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.