पर्रीकर होते सख्खे शेजारी - सुरेश प्रभू

Manohar Parrikar
Manohar Parrikar

मनोहर पर्रीकर खरेतर लोकांत रमायचे. लोकांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि अंमलबजावणी करता येईल, अशा उपाययोजना करणे यात त्यांचा हात कोणी धरू शकणारा नाही. संरक्षण मंत्रालय म्हणजे तेथे राष्ट्राच्या सुरक्षिततेशी संबंधित अनेक गोष्टींचा संबंध असतो. खऱ्या अर्थाने गोपनीयता पाळण्याचे हे मंत्रालय. त्यामुळे लोकांना आपल्या हृदयात स्थान देणारा हा लोकनेता संरक्षणमंत्री म्हणून कसा रुळतो याकडे सगळ्यांचेच लक्ष होते. त्यांच्यातील गुण हेरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण या महत्त्वाच्या मंत्रालयाचा ताबा त्यांच्याकडे दिला होता. पर्रीकर यांनीही या पदाला न्याय दिला.
- सुरेश प्रभाकर प्रभू, केंद्रीय वाणिज्य मंत्री

मनोहर पर्रीकर हे सज्जन, परोपकारी, हुशार आणि राष्ट्राभिमानी असे व्यक्तिमत्त्व होते. आमची २५ वर्षांपासूनची मैत्री होती. प्रत्येक दिवसागणिक आमची मैत्री बहरत गेली. योगायोगाने मी व त्यांनी एकाच दिवशी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली, राज्यसभेत आम्ही शेजारी-शेजारी बसत होतो, मंत्रीमंडळ बैठकीतही आमची बैठक व्यवस्था ही शेजारी-शेजारी आणि प्रत्यक्ष जीवनातही आम्ही शेजारीच होतो. अकबर रोड येथील आमची निवासस्थाने शेजारी-शेजारी होती. केवळ मध्ये एक दगडी कुंपण होते. हाक मारली तरी ऐकू जावे एवढे जवळ आमची निवासस्थाने होती. 

पर्रीकर यांची कर्मभूमी व माझा पूर्वाश्रमीचा राजापूर लोकसभा मतदारसंघही लागून-लागून आहेत. त्यामुळे त्यावेळीही अनेकदा आमची भेट व्हायची. पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री असताना ते अनेक विषयांवर माझ्याशी बोलायचे. त्याचवेळी देशाचा विचार समग्रपणे करण्याची ताकद व कुवत त्यांच्यात आहे हे जाणवायचे. तरीही ते राज्य सोडण्यास तयार नव्हते. गोमंतकीय जनतेविषयी वाटणारे ममत्व आणि प्रेम यामुळे त्यांना गोवा सोडवत नव्हते. अखेर देशाची गरज म्हणून त्यांनी त्यावेळी केंद्रात मंत्रिपद स्वीकारले होते. मला व त्यांना थेट मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले, राज्यसभेवर आम्ही नंतर निवडून आलो. अनेक बाबतीत आमच्यात साम्य होते. अर्थशास्त्र हा विषयही आमचा तसा आवडीचा. आकडेवारी व त्या आधारे केले जाणारे विश्‍लेषण हा आमच्या विचाराचा पाया होता. मनोहर पर्रीकर हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

पर्रीकर खरेतर लोकांत रमतात. लोकांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्याची अंमलबजावणी करता येईल, अशी उपाययोजना करणे यात त्यांचा हात कोणी धरू शकणारा नाही. मुख्यमंत्री असताना हे सारे ठीक होते. संरक्षण मंत्रालय म्हणजे तेथे राष्ट्राच्या सुरक्षिततेशी अनेक गोष्टींचा संबंध. खऱ्या अर्थाने गोपनीयता पाळण्याचे मंत्रालय. त्यामुळे लोकांना आपल्या हृदयात स्थान देणारा हा लोकनेता संरक्षण मंत्री म्हणून कसा रुळतो याकडे सगळ्यांचेच लक्ष होते. त्यांच्यातील गुण हेरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण या महत्त्वाच्या मंत्रालयाचा ताबा त्यांच्या कडे दिला. त्यांनीही या पदास योग्य न्याय दिला. देशाचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या क्षमतांत वाढ केली पाहिजे, कोणत्या क्षेत्रात संशोधन केले पाहिजे, कोणते विदेशी तंत्रज्ञान देशात आणले पाहिजे याचा ते बारकाईने अभ्यास करत असत. महिना दोन महिन्यात ते वर्षानुवर्षे संरक्षण मंत्री असल्याप्रमाणे ते निर्णय घ्यायचे. जागतिक राजकारण आणि राजनैतिकता याविषयातही ते पारंगत होते. राज्याचा मुख्यमंत्री ते संरक्षण मंत्री अशी मोठी झेप त्यांनी घेतली तरी ते गोव्यासारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्री याआधी होते, हे सांगूनही खरे वाटणारे नव्हते, एवढे ते दिल्लीत रमले होते.

कोणत्याही लोकप्रतिनिधीला आपल्या लोकांत मिसळले की काम करण्याची ऊर्जा मिळते, म्हणून ते अधून-मधून गोमंतकीय जनतेची ते भेटही घ्यायचे. गोवा हे आकाराने अत्यंत लहान राज्य. मात्र, विकासाबाबत आर्थिकदृष्ट्या प्रबळ राज्यांनाही गोव्याने मागे टाकले. तीनवेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या पर्रीकर यांनी विकासाचा ध्यास घेतला आणि गोव्याला देशाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान दिले. त्यांनी २००४ मध्ये दिल्लीत दरवर्षी भरणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात नेला आणि कोण हे पर्रीकर अशी चर्चा देशात सुरू झाली होती. सैनिकांच्या समस्या सोडविण्यावरही त्यांनी भर दिला होता. जनतेशी जसा थेट संवाद ते साधतात तसा थेट जवानांशी संवाद साधणे त्यांनी सुरू करून सेना दलातील अनेक प्रश्‍न समजून घेतले होते व मार्गी लावले होते. असा माझा हा मित्र आयुष्याच्या प्रवासात आम्हाला सोडून अकस्मिकपणे निघून गेला. आजाराशीही त्यांनी झुंज दिली. त्यांना आरोग्यापेक्षा त्यांच्यावरील जबाबदारी व देशाचे, गोव्याचे हित महत्त्वाचे असायचे. त्यामुळेच तर आजार वाढूनसुद्धा ते कामात मग्न असायचे. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्व देशवासीयांसाठी प्रेरणास्थान ठरेल. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्‍वर चरणी प्रार्थना.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com