२०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत आदिती सिंह यांनी काँग्रेसच्या तिकिटावर रायबरेलीत ९० हजार मतांनी विजय मिळवला होता.
लखनऊ - काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याआधीच भाजपमध्ये (BJP) गेलेल्या आदिती सिंह (Aditi SIngh) यांना आता भाजपने रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर आमदार झाल्यानंतर विधानसभा सदस्यत्व धोक्यात येऊ नये म्हणून भाजप प्रवेश केल्यानंतरही आदिती सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला नव्हता. गेल्या आठवड्यात त्यांनी राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण केली. आता त्यांनी थेट काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर टीका केली आहे. प्रियांका गांधी यांनी माझ्याविरोधात लढावं असं आव्हान त्यांनी दिलं आहे. काँग्रेसच्या मुलगी आहे, लढू शकते या घोषणेत दम नसल्याचंही आदिती सिंह यांनी म्हटलं. एकदा प्रियांका गांधींनी माझ्या विरोधात लढून दाखवावं, सगळं चित्र स्पष्ट होईल. रायबरेली आता काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला नाही असं आदिती सिंह म्हणाल्या.
काँग्रेसनं गृहित धरलं होतं की, अमेठी आणि रायबरेलीतील जनता त्यांच्यासोबत राहिल. त्या लोकांसाठी काँग्रेसनं काहीच केलं नाही. त्यांनी अनेक निवडणुका जिंकल्या तरी इथल्या जनतेला वाऱ्यावर सोडलं. आता आशा आहे की यावेळी इतिहास घडेल आणि रायबरेलीत कमळ फुलेल असा विश्वास आदिती सिंह यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) महिलांना ४० टक्के जागा देण्याच्या आणि काँग्रेसच्या मी मुलगी आहे, लढू शकते या घोषणेवर आदिती सिंह यांनी टीका केली. आदिती यांनी म्हटलं की, ही एक फक्त राजकीय घोषणा आहे. प्रत्यक्षात काँग्रेससाठी काहीही नाहीय. खरंच काँग्रेस यावर गंभीर आहे तर त्यांनी इतर राज्यात का लागू केलं नाही जिथं पक्षाचं वर्चस्व आहे. इतर राज्यात तर महिलांना २० टक्के सुद्धा तिकिटं दिलेली नाहीत. गोव्यात २८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात फक्त २ महिला आहेत.
रायबरेलीत सध्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकमेव हीच जागा जिंकता आली होती. तर दुसऱ्या बाजुला अमेठीत राहुल गांधींना भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
२०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत आदिती सिंह यांनी काँग्रेसच्या तिकिटावर ९० हजार मतांनी विजय मिळवला होता. आदिती यांचे वडिल अखिलेश कुमार सिंह हे वेगवेगळ्या पक्षांमधून आणि अपक्ष म्हणून रायबरेलीतून पाच वेळा आमदार झाले होते. २०१९ मध्ये आदिती सिंह यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आता वडिलांच्या पाठिंब्याशिवाय त्यांनी भाजपमधून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.