
उत्तराखंडला मुसळधार पावसाचा फटका बसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा रेड अलर्ट होता, परंतु आता पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथला जाणारे मार्ग येथे उघडले आहेत, परंतु यमुनोत्रीमध्ये आव्हान अजूनही कायम आहे. अडकलेल्या भाविकांना पर्यायी मार्गांनी पुढे नेले जात आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील २०० पर्यटक अडकले होते, त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना मदत करण्याची विनंती केली. यानंतर तात्काळ एनडीआरएफच्या पथकाने धाव घेवून या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.