राम मंदिराबाबत अध्यादेश आलाच पाहिजे; 'विहिंप'चा इशारा

VHP gives ultimatum to Modi Government over Ram Mandir
VHP gives ultimatum to Modi Government over Ram Mandir

नवी दिल्ली : 'अयोध्येत राममंदिराची निर्मिती करण्यासाठी न्यायालयीन निर्णय व घटनात्मक मार्गाला सरकारचे प्राधान्य राहील, असे सांगणाऱ्यांचा विचार दिल्लीत नऊ डिसेंबरला होणाऱ्या जाहीर सभेनंतर निश्‍चितपणे बदलेल. राममंदिराचे विधेयक वा अध्यादेश हिवाळी अधिवेशनात आलेच पाहिजे,' अशा शब्दांत विश्‍व हिंदू परिषदेने सत्तारूढ भाजप नेतृत्वाला इशारा दिला आहे.

या मुद्द्यावर परिषदेचे नेते व साधुमहंत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व सोनिया गांधी यांचीही भेट घेतील, असे स्पष्ट करण्यात आले. 

रामलीला मैदानावर येत्या नऊ तारखेला होणारी जाहीर सभा शब्दशः विराट करण्याचा निर्धार 'विहिंप'ने जाहीर केला आहे. या सभेनंतर देशात राममंदिराचा विरोधकच उरणार नाही, असे विहिंपचे महासचिव सुरेंद्र जैन यांनी सांगितले.

ते म्हणाले की, रामलीला मैदानाच्या आसपासचा 8-10 किलोमीटरचा संपूर्ण परिसर रामभक्तांनी व्यापलेला असेल. राममंदिरासाठी होणाऱ्या या सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्रमांक दोनचे नेते भैय्याजी जोशी यांच्यासह साधुमहंत आणि विहिंपचे सरचिटणीस आलोककुमार व अध्यक्ष न्या. कोकजे यांचीही भाषणे होतील. यात साध्वी ऋतंभरा यांचेही नाव वक्‍त्यांच्या यादीत टाकून राममंदिराचा मुद्दा मागे पडताच विस्मृतीत गेलेल्या साध्वीचे पुनरुज्जीवन करण्याचे विहिंपने ठरविले आहे. या सभेचे देशात अत्यंत दूरगामी परिणाम होतील, असा विहिंपचा दावा आहे. 

जैन यांनी सांगितले, की राममंदिरासाठी परिषदेने राष्ट्रपती व देशभरातील राज्यपालांच्या भेटी घेऊन निवेदने दिली आहेत. या पुढचा टप्पा म्हणजे सर्वपक्षीय खासदारांच्या गाठीभेटी घेणे हा आहे. संसदेत विधेयक आले तर त्याला पाठिंबा देण्याबाबतचे आश्‍वासन या खासदारांकडून घेतले जात आहे. कॉंग्रेससह विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी या प्रस्तावित विधेयकाला व प्रस्तावित राममंदिराच्या उभारणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगतानाच आपण संसदेत पक्षाच्या व्हीपला बांधील आहोत असे कबूल केल्याचा गौप्यस्फोट जैन यांनी केला. देशातील दलितही राममंदिराला पाठिंबा देतील, असे जैन म्हणाले. 

'संकल्प पुष्पा'चे वाटप 
1990च्या रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी जे बालक होते वा ज्यांचा जन्मही झाला नव्हता असे लाखो युवक रविवारच्या सभेसाठी दिल्लीत जमा होतील, असे विहिंपने म्हटले आहे. प्रस्तावित सभेसाठी नागरिकांना आमंत्रण देण्यासाठी विहिंपतर्फे दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील घराघरांत कुंकुमाक्षता व पत्रक असलेले 'संकल्प पुष्प' हे लिफाफे वाटले जातील. लोकांनी रामलीला मैदानावरील सभेसाठी येताना रस्त्यात जेथे रामाचे होर्डिंग, बॅनर लागेल तेथे या कुंकुमाक्षता वाहून नंतर मंदिराचा संकल्प सोडण्यासाठी सभेला यावे, असे आवाहन परिषदेने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com