नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या तब्बल सव्वातीनशे खासदारांची बैठक संसदीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झाली; मात्र दोन तासांच्या गुऱ्हाळानंतरही उपराष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ('एनडीए') उमेदवार कोण असणार, याबाबत आपल्या खासदारांना खुलेपणाने सांगण्याचे सत्तारूढ पक्ष व सरकारच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने आज तरी टाळले. भाजप संसदीय मंडळाची बैठक आज (सोमवार) संध्याकाळी होणार असून, त्यानंतर हे बहुप्रतीक्षित नाव घोषित होईल, असे भाजपमधून सांगण्यात आले.
रविवारच्या बैठकीत मोदी यांनी राष्ट्रपतिपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनाच मतदान होईल याबाबत सर्व पक्षांनी दक्ष राहावे, असे आवाहन केले. कोविंद यांनी आपली निवड या पदासाठी झाली याबद्दल आपण भाग्यवान असल्याचे सांगितले. सर्व राज्यांतून आपल्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याचेही ते म्हणाले. शहा यांनी भाजप उमेदवारास तब्बल 40 राष्ट्रीय पक्षांनी पाठिंबा दिला. एनडीएचा परीघही असाच वाढत जाईल याची ही चुणूक असल्याचे ते म्हणाले.
उपराष्ट्रपतिपदाबाबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी वरिष्ठ संघनेत्यांसह एनडीए नेत्यांबरोबर चर्चा केली आहे; मात्र नाव कोणाचे हे गुलदस्तात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पडल्यावरच आपण निश्चित केलेले नाव जाहीर करतील, हे स्पष्ट झाले आहे. समजलेल्या माहितीनुसार भाजपकडून घटकपक्षांच्या नेत्यांसमोर तीन-चार नावे सांगण्यात आली असून, त्यांना पाठिंबा देण्याचा शब्द मिळवूनच सारी गोपनीयता बाळगण्यात येत आहे. या नेत्यांना भाजपकडून आज उत्तररात्री किंवा आज दुपारपर्यंत अंतिम नाव कळविले जाईल व त्यांनी त्यावर मम म्हणावे, अशी एकंदर व्यूहरचना दिसत आहे. एनडीएच्या आजच्या बैठकीतील विविध भाषणांचा जो तपशील समोर आला तो पाहिल्यास मोदींनी निश्चित केलेल्या नावाला घटक पक्षांच्या राज्याराज्यातील नेतृत्वांकडून उघड विरोध होण्याची शक्यता नाही.
उपराष्ट्रपती डॉ. महंमद हामीद अन्सारी यांचा 10 वर्षांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपतो आहे. या पदाची निवडणूक व निकाल येत्या 5 ऑगस्टला (शनिवार) आहे. 21 जुलै हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. संसदेत दोन्ही सभागृहांचे खासदार (इलेक्ट्रोरल कॉलेज) हेच यासाठीचे मतदार असतात. मोदी सरकारकडे संसदेत सणसणीत बहुमत आहे. समाजवादी पक्षासारख्या दगडाखाली हात असलेल्या पक्षांचीही मते मोदी आपल्याबाजूने सहज वळवू शकतात. यासाठी विरोधकांनी गोपालकृष्ण गांधी यांचे नाव जाहीर केले आहे. त्यांनी तसे करून आपले पत्ते आधीच उघडल्याने भाजप उमेदवाराबद्दलची उत्कंठा वाढवत नेली जात असल्याचे जाणकार मानतात.
दरम्यान, आजच्या बैठकीला पंतप्रधान व भाजप अध्यक्ष शहा यांच्यासह लालकृष्ण अवानी, सुषमा स्वराज, राजनाथसिंह, रामविलास पासवान (लोजप), रामदास आठवले (रिपब्लिकन पक्ष), अनंत गीते, संजय राऊत, आनंदराव अडसूळ (शिवसेना), वाय. एस. चौधरी (तेलगू देसम), तसेच पीडीपीचे नेते हजर होते.
ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:
शंभर टक्के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफी - मुख्यमंत्री
ट्रोल्सची बिल्ली, राजनाथसिंहांवर म्यॉंव...!
द्रविड, झहीरची मानहानी करू नका! - गुहा
भावाने मारलेल्या दगडामुळे बहिणीला गमवावे लागले प्राण
फेडररचे विक्रमी विजेतेपद
भिवंडी जवळ अपघातात जुने नाशिकमधील 4 मृत्युमुखी; 2 जखमी
काँग्रेसचा वाह्यातपणा कधीपर्यत सुरू राहणार?: भांडारकर
‘आयटी’चा गिअर टाकल्याने पीएमपी होणार ‘गतिमान’
|