Indian President: देशातले एकमेव राष्ट्रपती जे साक्ष देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले; आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवला गेला सोफा

सर्वोच्च न्यायालयाच्या डॉकेटमध्ये साक्षीदारासाठी सोफा ठेवण्याची ही पहिली आणि शेवटची घटना आहे.
VV Giri
VV GiriSakal

त्या दिवशी सुप्रीम कोर्टात बराच गदारोळ झाला होता. देशातल्या सर्वात मोठ्या न्यायालयात सर्वजण सावध बसले होते. त्यादिवशी एका विशेष खटल्याची सुनावणी होणार होती, त्यात एक महत्त्वाची व्यक्ती साक्ष देण्यासाठी येणार होती. कोर्टरूममध्ये एक मोठी सोफ्यासारखी खुर्ची ठेवली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या डॉकेटमध्ये साक्षीदारासाठी सोफा ठेवण्याची ही पहिली आणि शेवटची घटना आहे.

त्या दिवशी अशी व्यक्ती साक्ष देणार होती, ज्याच्याकडे स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय उलटवण्याची ताकद आहे. ही व्यक्ती म्हणजे देशाचे चौथे राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी.

न्यायालयातल्या एखाद्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान देशाचे राष्ट्रपती पदावर असताना साक्ष देण्यासाठी पोहोचण्याचीही देशाच्या इतिहासात पहिलीच वेळ होती. त्यानंतरही सर्वोच्च न्यायालयात असं दृश्य पुन्हा दिसलं नाही. हे वर्ष 1970 होते, जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी न्यायालयात हजर झाले आणि कायदेशीर सूट मिळूनही त्यांचं म्हणणं नोंदवलं. ते कोणत्या प्रकरणात न्यायालयात हजर झाले आणि त्या खटल्याचा निकाल काय लागला हे सर्व नंतर कळेल. पण त्या आधी व्हीव्ही गिरी यांच्याबद्दल सर्व काही जाणून घ्या.

VV Giri
Independence Day 2023: ९ ऑगस्ट १९४७ - दंगलीच्या आगीत होरपळत होतं कोलकत्ता; शांत करायला गांधीजी गेले पण...

व्हीव्ही गिरी, स्वतंत्र भारताचे चौथे राष्ट्रपती.त्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1894 रोजी ओडिशातल्या ब्रह्मपूर इथं झाला. त्यांचे वडील व्ही.व्ही. जोगय्या पंतुलु हे वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय सदस्य होते. व्ही.व्ही.गिरी यांचं शालेय शिक्षण ब्रह्मपुरातच झाले. 1913 मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आयर्लंडला गेले. १९१३-१६ मध्ये त्यांनी डब्लिन विद्यापीठात शिक्षण घेतलं. नंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि बेरहामपूर बार कौन्सिलचा नेताही झाले. व्हीव्ही गिरी यांचं पूर्ण नाव वराहगिरी वेंकट गिरी असं होतं. तसंच ते देशाचे चौथे राष्ट्रपती बनले. ते देशाचे पहिले आणि शेवटचे स्वतंत्र राष्ट्रपती आहेत.

व्ही.व्ही.गिरी यांच्या आईही स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगात गेल्या होत्या. व्हीव्ही गिरी यांचा विवाह सरस्वतीबाईंशी झाला होता आणि त्यांना 14 मुलं होती. 1913-1916 दरम्यान आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन इथं शिकत असताना ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले आणि त्यांना अटकही झाली. यानंतर त्यांना आयर्लंडमधून हद्दपार करण्यात आल्याने भारतात परतावं लागलं. 1920 मध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या आवाहनावरून असहकार आंदोलनात भाग घेतला.

VV Giri
Independence Day 2023: छोटीशी काडेपेटी पण तिनेच पेटवली मनामनात स्वातंत्र्याची आग..

देशाचे चौथे राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी हे सुरुवातीपासूनच मजुरांचे मोठे नेते होते. 1928 साली त्यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कामगारांचा अहिंसक संप झाला. ब्रिटिश राजवट आणि रेल्वे व्यवस्थापनाला कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. कामगार संघटनांना स्वातंत्र्य चळवळीत भागीदार बनवण्याचं मोठं श्रेय व्ही.व्ही.गिरी यांना जातं. दुसऱ्या गोलमेज परिषदेत त्यांनी कामगारांचं प्रतिनिधित्व केलं. स्वातंत्र्यानंतरही 1952 मध्ये त्यांना नेहरू सरकारमध्ये कामगार मंत्रालयाची जबाबदारी मिळाली. औद्योगिक वादात व्यवस्थापनाने कामगारांशी चर्चा करून तोडगा काढावा, असा त्यांचा विचार होता. याला 'गिरी-अ‍ॅप्रोच' म्हणतात.

कोणत्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान देशाचे चौथे राष्ट्रपती व्हीव्ही गिरी साक्ष देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते.

देशाचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचं १३ मे १९६९ रोजी निधन झालं. यानंतर व्हीव्ही गिरी यांची हंगामी राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली. नंतर पुढच्या राष्ट्रपतीसाठी निवडणुका घ्याव्यात असं ठरलं. त्यावरून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सिंडिकेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. इंदिरा गांधींच्या विरोधाला बगल देत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नीलम संजीव रेड्डी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

सिंडिकेटवर नाराज इंदिरा गांधींनी व्ही.व्ही.गिरी यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांनी सदसद्विवेकबुद्धीनुसार मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. नीलम संजीव रेड्डी, व्हीव्ही गिरी आणि विरोधी उमेदवार सीडी देशमुख यांनी १६ ऑगस्ट १९६९ रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली. यामध्ये व्ही.व्ही.गिरी विजयी झाले. पहिल्या पसंतीमध्ये त्यांना 48 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. त्यानंतर दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीत त्यांना बहुमत मिळाले. व्हीव्ही गिरी हे केवळ देशाचे पहिले स्वतंत्र राष्ट्रपती बनले नाहीत तर ते आतापर्यंतचे एकमेव हंगामी राष्ट्रपती देखील आहेत, जे नंतर राष्ट्रपती झाले.

व्हीव्ही गिरी यांच्या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी चुकीच्या पद्धती वापरण्यात आल्याचं याचिकेत म्हटलं होतं. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान राष्ट्रपती व्हीव्ही गिरी स्वत: सर्वोच्च न्यायालयात हजर झाले आणि त्यांची साक्षीदार म्हणून चौकशी करण्यात आली. शेवटी, सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळून लावली आणि त्यांची निवड कायम ठेवली.

24 ऑगस्ट 1969 ते 24 ऑगस्ट 1974 पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलं. त्यांच्यानंतर फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती झाले. त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना 1975 मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला. 24 जून 1980 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी मद्रास (आताचे चेन्नई) इथं त्यांचं निधन झालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com