नवी दिल्ली - पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधानांकडे केली.
ममता बॅनर्जी यांनी आज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींना नवरात्रीनंतर पश्चिम बंगाल भेटीचे आमंत्रणही दिले. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते.
बॅनर्जी यांनी त्यांना कुर्ता आणि मिठाईही भेट दिली. त्यानंतर चर्चेवेळी पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची आणि राज्यासाठी 13,500 कोटी रुपयांच्या निधीचीही मागणी केली. पंतप्रधानांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ममता यांनी सांगितले.
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) हा आसाम कराराचा भाग होता. इतर ठिकाणी त्याची तरतूदच नव्हती, याकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधल्याचे ममता बॅनर्जी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
'मी दिल्लीला येते तेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत असते. यावेळी अर्थमंत्र्यांशी भेट होऊ शकणार नाही. कारण पश्चिम बंगालचे अर्थमंत्री आलेले नाहीत. मोदींबरोबरची आजची भेट ही राजकीय भेट नव्हती,' असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. शहा यांनी वेळ दिल्यास उद्या त्यांची भेट घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.
|