लसीकरण सर्वांसाठी सुरु का केलं जात नाहीय? आरोग्य मंत्रालयानं दिलं उत्तर

corona_vaccination
corona_vaccination

नवी दिल्ली- भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यामध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती आणि असाध्य रोगाने ग्रासलेल्या 45 वर्षांपुढील व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली. 1 एप्रिलपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करण्यात आला असून यात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व व्यक्तींना कोरोनाची लस दिली जात आहे. लसीकरण होत असलं तरी देशात कोरोना रुग्ण वाढ थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे देशातील सरसकट नागरिकांना कोरोनाची लस देण्यात यावी. यात वयाचं मर्यादा असू नये अशी मागणी होतं आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. सरकारचं लक्ष्य सर्वांना लस देण्यापेक्षा ज्यांना त्यांची सर्वाधिक गरज आहे अशांना ती देण्याचं आहे, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. 

कोरोना विषाणूमुळे होणारे मृत्यू कमी करणे आणि आरोग्य व्यवस्थेवरील भार कमी करणे हे सरकारचे उदिष्ट आहे. त्यामुळे सरसकट लोकांना कोरोनाची लस तुर्तास देता येणार आहे. ज्यांना लस हवी आहे, त्यापेक्षा ज्यांना लशीची सर्वाधिक गरज आहे, अशांना ती आधी दिली जात आहे, असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत दिल्ली, महाराष्ट्र सरकारने कोरोना लसीकरणासाठी वयाची मर्यादा वाढवावी अशी मागणी केली होती. 

देशात सर्वाधिक वेगानं रुग्णसंख्या वाढणाऱ्या महाराष्ट्रात RT-PCR चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात यावं अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून हे प्रमाण कमी झाल्याचा दावा आरोग्य मंत्रालयानं केला आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात एकूण चाचण्यांपैकी केवळ ६० टक्के RT-PCR चाचण्या झाल्या आहेत. या चाचण्यांचं प्रमाण ७० टक्के आणि त्याहून अधिक करण्याच्या सूचना राज्याला देण्यात आल्याचं आरोग्य सचिव भूषण यांनी सांगितलं. भूषण म्हणाले, महाराष्ट्रात देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ५८ टक्के रुग्ण आहेत. तसेच देशातील एकूण मृत्यूंपैकी ३४ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. तसेच देशात ज्या टॉप १० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली या राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पंजाब आणि छत्तीसगडमध्ये मृत्यूचं प्रमाण हे अतिउच्च प्रमाणात वाढल्याचा दावाही भूषण यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com