पाटणा - "राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष यांनी केलेल्या टीकेला योग्य वेळी उत्तर देईन,'' असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (गुरुवार) स्पष्ट केले. बिहारच्या हितासाठीच भारतीय जनता पक्षाशी युती केल्याची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली.
लालूप्रसाद यादव आणि राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असतान नितीशकुमार म्हणाले, ""योग्य वेळी मी त्यांच्या आरोपांना उत्तरे देईन. बिहारच्या विकासाला माझे प्राधान्य असेल. बिहारच्या हिताचाच निर्णय मी घेतला आहे. लोकांची सेवा या पुढेही करत राहणार आहे.''
नितीशकुमार यांनी बिहारी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला होता. त्याबाबत विचारले असता नितीशकुमार म्हणाले, ""जनतेचे हित लक्षात घेऊनच भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे.''
नितीशकुमार यांनी या संदर्भात ट्विटही केले आहे. ""कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारावर तडजोड केली जाणार नाही,'' याचा पुनरुच्चार त्यांनी त्यात केला आहे. पंतप्रधानांनी काल त्यांचे अभिनंदन केले होते. त्याला उत्तर देताना त्यांनी "केंद्राच्या सहकार्याने राज्यात विकासाला गती मिळेल, असे म्हटले आहे.
|