SSC Exam
SSC Exam esakal

SSC Exam : राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांची शुक्रवारपासून दहावी परीक्षा होणार सुरू

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (ता. १) सुरू होत आहे.

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (ता. १) सुरू होत आहे. परीक्षेसाठी २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख नऊ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ‘‘विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तणावमुक्त वातावरणात ही परीक्षा द्यावी,’’ असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

राज्य मंडळाच्या वतीने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात येत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३२ हजार १८९ ने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

यंदा खासगी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. राज्य मंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिकराव बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी पेपरच्या नियोजित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. तसेच दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात येत आहेत.

दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी -

विद्यार्थी : ८,५९,४७८

विद्यार्थिनी : ७,४९,९११

तृतीयपंथी : ५६

एकूण : १६,०९,४४५

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कधीपर्यंत हजर राहावे, यासंदर्भातील पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे राज्य मंडळातर्फे देण्यात आली आहेत.

प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?

परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परीरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत असतील. त्यांनी परीरक्षण केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यत आणि वितरित करेपर्यंत मोबाईलमध्ये चित्रीकरण करतील. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी परीरक्षक यांची जीपीएस प्रणाली सुरू असणार आहे. परीक्षा केंद्रावर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका देताना एका वर्गासाठी २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सीलबंद पाकिट असेल. हे पाकिट पर्यवेक्षक परीक्षा कक्षातील दोन परीक्षार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन उघडतील.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी कधीपर्यंत उपस्थित राहावे?

परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे, अशा सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत परीक्षार्थींना यापूर्वीच दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरही (हॉलतिकिट) नमूद केले आहे.

सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात अकरा वाजता आणि दुपारच्या सत्रात  तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. सकाळच्या सत्रात अकरानंतर आणि दुपारच्या सत्रात तीननंतर परीक्षार्थी आल्यास तो परीक्षेपासून वंचित राहील, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थी वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा देऊ न शकल्यास काय करावे?

राज्य मंडळाने दिलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लेखी परीक्षेनंतर घेण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांना २७ ते ३० मार्च या कालावधीत ‘आउट ऑफ टर्न’ आयोजित केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com