भारतामधील जपानची गुंतवणूक 

japan-investment
japan-investment

भारतीय अर्थव्यवस्थेत जपान हे चौथ्या क्रमांकाचे गुंतवणूकदार राष्ट्र आहे. जपानने २०००-२०२०मध्ये भारतात ३३.५ अब्ज डॉलर गुंतवणूक केली आहे. भारत आणि जपानचे सांस्कृतिक संबंध खूप जुने असून, त्यानंतर व्यावसायिक संबंध प्रस्थापित झाले आहेत. २०११मध्ये भारत-जपानमधील आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांना गती देण्यासाठी व्यापक आर्थिक भागीदारी झाली. जपानने २०१६मध्ये भारताची पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि जलद वाढीमुळे उद्भवलेल्या भारताच्या सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अधिकृत विकास साहाय्य (ओडीए) प्रदान करणारे धोरण जाहीर केले. 

जपानी नागरिकांना भारताने १ मार्च २०१६ रोजी ‘VISA ON ARRIVAL’ जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८-२९ ऑक्टोबर २०१८मध्ये जपानच्या १३व्या वार्षिक शिखर परिषदेला भेट दिल्याने द्विपक्षीय संबंधांना आणखी उत्तेजन मिळाले. आरोग्य सेवा, टपाल सेवा, पर्यावरण सेवा आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रांदरम्यान दोन देशांमधील ३२ प्रकारच्या सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. याच भेटीमध्ये भारत आणि जपानमध्ये डिजिटल पार्टनरशिपही झाली. यामध्ये भारतात ‘स्टार्ट अप हब’ स्थापित करणे देखील समाविष्ट आहे. ऑक्टोबर २०१८मध्ये केलेल्या सर्व्हेप्रमाणे भारतामध्ये १४४१ जपानी कंपन्या आहेत. ‘हिताची’, ‘होंडा कार्स’, ‘होंडा मोटरसायकल’, ‘यामाहा’, ‘मित्सुबिशी’, ‘पॅनासॉनिक’, ‘सोनी’, ‘टोयोटा’, ‘तोशिबा’, ‘मारुती सुझुकी’, ‘कॅनन’, ‘मित्सुई’, ‘मिझुहो’ या भारतामध्ये असणाऱ्या काही मोठ्या कंपन्या आहेत. जपानची भारतामधील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढतच आहे. MUFG बँकेने भारतामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले आहे. सॉफ्टबँक कंपनीने भारतामध्ये अलीकडेच १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. 

जपान हा असा एकमेव देश आहे ज्याने भारतामध्ये १३ टाऊनशिप्स घोषित केल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुपा, कर्नाटकमध्ये वसंत नरासपूर, गुजरातमध्ये मंडल, राजस्थानमध्ये निमरणा, तामिळनाडूमध्ये वन हब इत्यादीचा समावेश आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने भारतामध्ये जपानवर लक्ष केंद्रित करून सेंद्रिय शेती केली जात आहे. जपानने भारतामध्ये नुकतेच टेक्स्टाईल पार्क जाहीर केले आहे. जपान आणि भारत मिळून ‘५जी’वर काम सुरू केले आहे. 

पुढील १० वर्षांमध्ये जपानच्या अनेक कंपन्या भारतामध्ये येतील, यात शंका नाही. सर्व गोष्टींमुळे भारतातच मोठ्या संख्येने संधी निर्माण होतील. या संधी नोकऱ्या तसेच व्यावसायिक क्षेत्रातील असतील. विशेषतः ज्यांना जपानी संस्कृती समजली आहे आणि जे जपानी बोलू शकतात, ते याचा फायदा घेऊ शकतात. भविष्याचा विचार करणाऱ्यांनी जपानी शिकणे सुरू करावे. आपण एक दोन वर्षांच्या आत लाभ मिळविणे सुरू करू शकता. सुरू करताय ना जपानी भाषेचा अभ्यास? 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com