‘अभिनव ज्ञानेश्वरी’ची यशोगाथा

शेतकरी आणि शेतीबद्दलचा दृष्टिकोन बदलून टाकणारं डॉ. चित्रलेखा पुरंदरेलिखित ‘एका एकराची अभिनव ज्ञानेश्वरी’ हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं.
book eka ekrachi abhinav dnyaneshwari
book eka ekrachi abhinav dnyaneshwarisakal

प्रेरणास्रोत म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर एखादा शास्त्रज्ञ, लेखक, कवी किंवा राजकारणी येतो, पण एक शेतकरी लाखो लोकांचा प्रेरणास्रोत होऊ शकतो का? असा प्रश्न विचारल्यास कदाचित आपण त्याचं सकारात्मक उत्तर ठामपणे देऊ शकणार नाही. त्यामुळेच शेतकरी आणि शेतीबद्दलचा दृष्टिकोन बदलून टाकणारं डॉ. चित्रलेखा पुरंदरेलिखित ‘एका एकराची अभिनव ज्ञानेश्वरी’ हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं.

या पुस्तकात एका अशा शेतकऱ्याचं जीवन चरित्र साकारलं आहे, ज्याला प्रसिद्धीचं कोणतंही वलय लाभलेलं नव्हतं, ना कोणती मोठी पार्श्वभूमी होती. या शेतकऱ्याकडे होता प्रबळ आत्मविश्वास, शेती करण्याची जिद्द आणि नवनवे प्रयोग करण्याचं धाडस! या प्रयोगात तो यशस्वीही झाला, पण ही कथा इथेच थांबत नाही तर, हे प्रयोग केवळ स्वतः पुरते मर्यादित न ठेवता त्या शेतकऱ्यानं सुमारे पावणे दोन लाख शेतकऱ्यांना या प्रयोगातून मिळालेले ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करून त्यांनाही आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीचा सुंदर मिलाफ साधत शेती करण्यासाठी प्रेरणा दिली. या शेतकऱ्याचं नाव ज्ञानेश्वर निवृत्ती बोडके.

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील बोडकेवाडी हे ज्ञानेश्वर बोडके यांचं मूळ गाव. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बोडके यांनी शेतीत विविध प्रयोग केले. ते यशस्वी करण्यासाठी अफाट मेहनत घेतली आणि शेतकऱ्यांसमोर स्वतःचाच आदर्श निर्माण केला. देश-विदेशांत दौरे करून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं.

परंतु, इथेच न थांबता आपल्या उत्पादनांचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करून त्यातही यश संपादन केलं. हे करत असताना व्याख्यानांच्या आणि प्रत्यक्ष शेतीविषयक प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन केलं. या घडामोडींची यशोगाथा या पुस्तकात शब्दबद्ध केलेली आहे.

आज अभियंत्याला, शास्त्रज्ञाला किंवा अभिनेत्याला जितका सन्मान मिळतो, तितका कृषिप्रधान देश असलेल्या भारतात शेतकऱ्यांना मिळत नाही. युवक-युवती करियर म्हणून शेतकरी होण्याचा विचारही क्वचितच करतात. एक यशस्वी क्षेत्र म्हणून शेतीकडे पाहिले जात नाही.

हे चित्र बदलण्यासाठी एक शेतकरी कशा पद्धतीने पुढे सरसावतो आणि व्यवस्थेशी संघर्षाचा मार्ग न निवडता, परिस्थितीशी संघर्ष करत व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतो याची कहाणी म्हणजे हे पुस्तक आहे. हे पुस्तक गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांची आस असणाऱ्या तरुण पिढीला शेतीतूनही पुष्कळ पैसा मिळू शकतो याचा विश्वास देते.

(संकलन : रोहित वाळिंबे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com