महामानवाची अलौकिक जीवनगाथा

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान देणारे, परंतु काहीसे दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे योगी अरविंद.
yogi arvind
yogi arvindsakal

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान देणारे, परंतु काहीसे दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे योगी अरविंद. विलक्षण बुद्धिमत्ता लाभलेला विद्यार्थी, प्रचंड लोकप्रिय असलेला प्राध्यापक, इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतिकार्यात सक्रिय असलेला क्रांतिकारक आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारा महान योगी, असे योगी अरविंदांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. या त्यांच्या जीवनचरित्राचा व तत्त्वज्ञानाचा आढावा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी ‘मुक्तिगाथा महामानवाची’ या पुस्तकातून घेतला आहे.

योगी अरविंद म्हणजेच अरविंदबाबू घोष यांचे जीवनचरित्र अत्यंत विलक्षण आहे. मूळचे बंगालचे असलेले योगी अरविंद यांच्यावर बालपणी पूर्णपणे पाश्चात्त्य विचारसरणीचे संस्कार रुजविण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण पाश्चात्त्य देशात आणि त्याच संस्कारात वाढलेले अरविंद शिक्षण पूर्ण करून भारतात दाखल झाले आणि पुढे भारतीय संस्कारांचे केवळ पालनकर्तेच नव्हे, तर आधुनिक काळातील ऋषी ठरले. त्यांचा जीवनप्रवास या पुस्तकात मुळातून वाचताना फार आश्चर्य वाटते.

अरविंद यांचा शैक्षणिक जीवनातील कालखंड अत्यंत कठीण आणि संकटांनी भरलेला आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे अरविंद यांनी कितीतरी दिवस चहा आणि पाव यावर काढले आहेत. तरीदेखील त्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख कायम चढताच ठेवला. अरविंद आयसीएस परीक्षा उच्चांक मिळवत उत्तीर्ण झाले होते.

मात्र, असे असूनही त्यांचा ओढा गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्याऐवजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे अधिक होता. ‘मागील १३ वर्षांमध्ये इतक्या बुद्धिमत्तेचा विद्यार्थी पाहिला नाही’ हे उद्गार योगी अरविंद यांनी लिहिलेली उत्तर पत्रिका तपासणाऱ्या प्रा. ऑस्कर ब्राऊनिंग यांनी काढले होते. इतकी प्रखर विद्वत्ता लाभूनही प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याऐवजी अरविंद यांनी प्राध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारली.

पुढे योगी अरविंद यांनी नोकरी सोडून भारतीय स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तुरुंगवासही भोगला. तुरुंगवासाच्या काळातही त्यांनी चिंतन केले व आध्यात्माचा मार्ग निवडला. योगी अरविंद यांचे सारे जीवनच अलौकिक आहे, पण त्याबरोबर त्यांचे तत्त्वज्ञानही प्रखर आणि सार्वकालीन उपयुक्त ठरणारे आहे.

भारतीय लोकांनी उत्सव आवर्जून साजरे करावेत, परंतु उत्सवबाजपणा टाळून देशाच्या आणि स्वतःच्या विकासासाठी सचोटीने सतत प्रयत्नरत राहायला हवे, असे सांगणाऱ्या योगी अरविंदांना आपण आदर्श मानले, तर आपलेही जीवन नक्कीच उजळून निघेल.

(संकलन - रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com