competitive exam
competitive examsakal

पहिले अपयश पचवताना...

खरं तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अपयशच आलं नाही, असं म्हणणारा एखादाच दुर्मीळ व्यक्ती आपल्याला भेटेल. बहुतांश विद्यार्थ्यांच्या नशिबी एक ना वेळा अनेक अपयश आलेलेच असते.

- अविनाश शितोळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक लेखक - द लॉजिक बूस्टर, द ॲनालिस्ट

कवी सुरेश भट एके ठिकाणी असे म्हणतात की,

जर हवे मद्य जगण्याचे,

जर हवी धुंद जन्माची,

तर विसळ तुझ्या रक्ताने

हृदयाचा फुटका पेला!

म्हणजेच काय की, जर विजयाचा घोट प्यायचा असेल, तर हृदयाचा फुटका पेला आपल्या रक्ताने विसळता यायला हवा. जर शिखराच्या टोकावर पोहोचण्याची उर्मी मनात बाळगत असाल, तर टेकडीवरून चालताना पाय रक्तबंबाळ करून घेण्याची तयारीही असायला हवी. लाखो लोकांच्या स्पर्धेत विजय मिळवणारा एखादा म्हणून आपल्याला यशस्वी व्हायचे असेल, लाखो लोकांनी टाळलेला शिस्तीचा आणि मेहनतीचा मार्ग निवडता यायला हवा. एवढं सगळं करूनही आलंच एखादं अपयश, तर त्यालाही अंगावर मांजराच्या पिलासारखं कुरवाळून हळूच जमिनीवर सोडून देता यायला हवं.

अपयश म्हणजे काय?

खरं तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अपयशच आलं नाही, असं म्हणणारा एखादाच दुर्मीळ व्यक्ती आपल्याला भेटेल. बहुतांश विद्यार्थ्यांच्या नशिबी एक ना वेळा अनेक अपयश आलेलेच असते. परंतु, स्पर्धा परीक्षेत आलेलं पहिलं अपयश हे पहिल्या यशाइतकंच किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त मूल्यवान असतं. या पहिल्या अपयशाने काही लोक अभ्यासाचा रस्ताच बंद करून टाकतात.

कोणी अभ्यास सोडून व्यवसाय सुरू करतात, तर कोणी जिद्दीने आणि ईर्षेने पेटून उठून पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागतात. अपयश म्हणजे काय? तर आपण स्वतःकडून ठेवलेल्या अपेक्षा आणि आपलं कर्तृत्व यामधील अंतर म्हणजे अपयश होय. आपण अपेक्षा ठेवतो ७० गुणांची आणि आपलं कर्तृत्व ४० गुणांचं असतं, तेव्हाच आपण ३० गुणांनी अपयशी ठरतो.

मग या अपयशातून शिकणारा आयुष्यात कोणत्याच परीक्षेत नापास होऊ शकत नाही. स्पर्धा परीक्षेत एक नियम आहे, की एक चूक एकदाच करा. त्याच त्या चुकांची पुनरावृत्ती करणारे पराभूत होण्यासाठीच काम करतात. विजेते मात्र एक चूक कधीच दुसऱ्यांदा करत नाहीत.

यशाचा कळस गाठा

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे खरंच आहे. परंतु वर्षानुवर्षे आपण जर अपयशाच्याच पायऱ्या चढत राहिलो, तर यशाचा कळस आपण कधी गाठणार? त्यासाठी कधी तरी स्वतःशी बोलता यायला हवं. स्वतःमधल्या ‘मी’ला काही प्रश्न विचारावेत आणि त्याच्या उत्तरावरून नव्या दिशा आणि नव्या वाटा ठरवायला पाहिजेत.

स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आल्यास वातावरण किंवा पुस्तके किंवा अभ्यासिका बदलणारे अनेक लोक आहेत, परंतु माझ्या मते सर्वांत जास्त गरज असते ती अभ्यासाची पद्धत बदलण्याची! शाळेमध्ये आपल्याला काटकोन, त्रिकोण, चौकोन असे सगळेच कोन शिकवतात, परंतु अपयशी झाल्यानंतर काय करायचं? हा दृष्टिकोन मात्र शिकवला जात नाही. गरज आहे हा दृष्टिकोन शिकवण्याची!

स्वतःला प्रोत्साहन द्या

काबाडकष्ट करणाऱ्या वडिलांचा चेहरा आठवा. आपल्या यशाकडे आस लावून बसलेल्या आपल्या आईचे हसरे डोळे आठवा. मित्रांना जेव्हा तुम्ही पास झाला हे कळेल, तेव्हा ते तुम्हाला कुठे पार्टी मागतील? ती तुम्ही कशी द्याल? याचा एका क्षणासाठी विचार करा. तुमचं मन लगेच तुम्हाला अपयशापासून दूर ढकलून कामाकडे प्रोत्साहित करील. मनुष्य हा समाजशील प्राणी ठरतो तो या भावनांमुळेच!

मित्रहो, नेहमी लक्षात ठेवा की, इतिहास हा विजेत्यांचाच लिहिला जातो. दोन मार्कांनी नापास झालेल्याचे नाव कोणीही घेत नाही आणि जो पास झाला तो दोन मार्कांनी पास कसा झाला? हेदेखील त्याला कोणीही विचारत नाही. त्यामुळे या दोन मार्कातील अंतर पार करण्याची तयारी आजपासूनच सुरू करा.

शेवटी इतकंच लक्षात ठेवा की,

हे असे आहे तरी पण

हे असे असणार नाही

दिवस आमचा येत आहे

तो घरी बसणार नाही

आजचे आमचे पराभव

पचवतो आम्ही उद्यास्तव

विजय तो कसला उरावर

जखम जो करणार नाही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com