Educational Policy : शिक्षणाचा हक्क कायद्यात सुधारणा! आता पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा

शालेय शिक्षण विभाग यावर्षीपासून पाचवी आणि आठवीच्या वर्गांच्या वार्षिक परीक्षा घेणार आहे. पाचवी आणि आठवी या टप्प्यांवर प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची परीक्षा होणार.
School Annual Exam
School Annual Examsakal

पुणे - राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू करायचे असेल, तर गुणवत्तेच्या दृष्टीने पहिलीपासून आठवीपर्यंत नापास करायचे नाही, हे परवडणारे नाही, हे लक्षात आल्यावर शालेय शिक्षण विभाग यावर्षीपासून पाचवी आणि आठवीच्या वर्गांच्या वार्षिक परीक्षा घेणार आहे. पाचवी आणि आठवी या टप्प्यांवर प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची परीक्षा होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अनुदानित आणि विनाअनुदानित सर्व शाळांना हा नियम लागू असेल.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत अणुत्तीर्ण करता येत नव्हते. मात्र, विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करण्याची सक्ती या कायद्यात होती. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थी बहुतांश विषयात कच्चा राहू लागला.

त्याची गुणवत्ता थेट नववीच्या वार्षिक परीक्षेत होऊ लागल्याने तिथे विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरत होता. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करावे लागणार आहे. यात गुणवत्तेला अधिक प्राधान्य आहे.

म्हणून शालेय शिक्षणात दोन टप्प्यांवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता जोखण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मध्ये राज्य सरकारने सुधारणा केली आहे.

सुधारित नियमांनुसार, इयत्ता पाचवीच्या वर्गापर्यंत बालकाला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल. इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना बालकास पाचवीच्या वर्गासाठीची विहित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. बालक ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्या बालकाला पाचवीच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल.

यामुळे आता शाळेतील प्रवेशाच्या एक टप्प्यावर म्हणजे पाचवीला परीक्षा देत त्याची गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. यामुळे शिक्षक आणि पालक या दोघांचीही शैक्षणिक जबाबदारी वाढणार आहे. यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

School Annual Exam
Army MNS Admission : बारावीनंतर मुलींना लष्करात नोकरी करण्याची मिळणार संधी

नापास झाल्यास फेरपरीक्षा

विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात जाण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करता यावी म्हणून प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर अशा बालकाला संबंधित विषयासाठी शाळेला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन द्यावे लागेल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्याची पुनर्परीक्षा घ्यावी लागेल.

विद्यार्थी पुनर्परीक्षेत नापास झाले, तर त्यांना पाचवी किंवा आठवीच्या वर्गात, जसे असेल तसे ठेवले जाईल. मात्र, प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही.

School Annual Exam
Indian Army : सैन्यदलाद्वारे तांत्रिक आणि विधी विभागासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

पहिलीपासून परीक्षाच नाही, असा समज झाला होता. परंतु प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याचे सर्वंकष मूल्यमापन झाले पाहिजे. त्यामुळे पाचवी आणि आठवीला वार्षिक परीक्षा सुरू होणार असेल, तर त्याचे स्वागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी गांभीर्य रुजेल आणि शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासही मदत होईल.

- नंदकुमार सागर (अध्यक्ष, मुख्याध्यापक महासंघ, पुणे)

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करणार आहे. पाचवी आणि आठवी हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामुळे त्या टप्प्यापर्यंत त्यांना शिकवलेल्या गोष्टी व्यवस्थित समजल्या आहेत की नाही याची पडताळणी होण्याच्या दृष्टीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- सूरज मांढरे (शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com