Eleventh Admission : हजेरीची सक्ती नसलेल्या महाविद्यालयात हुशार विद्यार्थ्यांचा प्रवेश; खासगी शिकवणीवर भर

दहावीनंतर एखाद्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास संबंधित महाविद्यालयात नियमित जाऊन वर्गात हजेरी लावावी लागते.
Online-Admission
Online-Admissionsakal

प्रसंग एक

दहावीनंतर एखाद्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास संबंधित महाविद्यालयात नियमित जाऊन वर्गात हजेरी लावावी लागते. त्याऐवजी बारावीची परीक्षा आणि जेईईच्या तयारीसाठी खासगी शिकवणीवर लक्ष केंद्रित करणे, जास्त महत्त्वाचे वाटते.

म्हणूनच हजेरीची सक्ती नसलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला,’ असे दहावीत ९२ टक्के मिळवलेल्या अर्णव (नाव बदलले आहे) याने सांगितले.

प्रसंग दोन

श्रुती (नाव बदलले आहे) म्हणते, ‘मला आयआयटीमधून बी.टेक करायचे आहे. त्यासाठी ‘जेईई’ची तयारी करायची असून, त्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यासाठी खासगी शिकवणीवर भर देण्याचा विचार असून, त्या दृष्टीने सोईस्कर महाविद्यालय निवडणार आहे.’

अर्णव असो किंवा श्रुती यांच्यासारखे दहावीत ९० टक्के किंबहुना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळूनही अनेक विद्यार्थी शहरातील नामांकित महाविद्यालयांऐवजी सर्वसाधारण महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र प्रकर्षाने दिसत आहे.

दहावीनंतर थेट जेईई, नीट या प्रवेश परीक्षांच्या तयारीला अधिक महत्त्व देत हे विद्यार्थी खासगी शिकवणी व्यवस्थित करता यावी, यासाठी सर्वसाधारण महाविद्यालयांना पसंती देत आहेत. इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली नियमित यादी जाहीर झाली असून, यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

दरम्यान, या प्रक्रियेत हुशार म्हणजेच दहावीच्या परीक्षेत साधारणत: ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेले काही विद्यार्थी नामांकित महाविद्यालयांऐवजी सर्वसाधारण महाविद्यालयांना पसंती देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांशिवाय अन्य साधारण महाविद्यालयांचा ‘कट-ऑफ’ही यंदा वाढल्याचे निदर्शनास येते.

अशी महाविद्यालये निवडण्याची कारणे

  • महाविद्यालयात हजेरीची सक्ती नसणे

  • खासगी शिकवणीवर लक्षकेंद्रित करता येण्याची सोय

  • महाविद्यालयापेक्षा खासगी शिकवणीतील हजेरीला प्राधान्य देणे शक्य

  • बारावी आणि प्रवेश परीक्षेची तयारी करण्याचा मार्ग मोकळा होणे

  • महाविद्यालयात प्रवेश घेऊनही खासगी शिकवणीवर पैसे खर्च होतात, त्यापेक्षा शिकवणीला प्राधान्य देण्याची पालकांची भूमिका

  • नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ घसरला : प्राचार्यांचे निरीक्षण

Online-Admission
Deccan College : डेक्कन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवली संस्कृत इंटर्नशिप कार्यशाळा

विशेष काळजी घेण्याची सूचना

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान ठराविक कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रलोभने दाखवली जात असल्याची बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे आता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ‘स्टुडंट लॉगिन’मध्ये यासंदर्भात विशेष काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.

खासगी शिकवण्यांशी संगनमत

खरेतर अनेक सर्वसाधारण महाविद्यालयांनी खासगी शिकवणी घेणाऱ्यांशी संगनमत केल्याचे दिसून येते. ही शिकवणी लावणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यास अप्रत्यक्षरीत्या सांगितले जाते. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात. परंतु हे विद्यार्थी महाविद्यालयात नियमित हजर असण्यापेक्षा शिकवणीमध्येच असतात, अशी ही पद्धत आहे. परंतु यावर शिक्षण संचालनालयाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते.

Online-Admission
Eleventh Admission : अकरावी प्रवेशाची दुसरी नियमित गुणवत्ता यादी ३ जुलैला होणार जाहीर

जेईई, नीट प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या खासगी शिकवणीचालकांनी काही महाविद्यालयांशी ‘टाय-अप’ केले आहे. त्यामुळे खासगी शिकवणी लावणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सांगितले जाते. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी ओढा खरेतर साधारण असणाऱ्या पण खासगी क्लासशी संगनमत असणाऱ्या महाविद्यालयांकडे असतो. परिणामी नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ हा गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या घसरत आहे. काही वर्षांपूर्वी आपटे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावीच्या प्रवेशाचा कट-ऑफ हा ९६ टक्के ते ९८ टक्के इतका असायचा. आता तो घसरल्याचे दिसून येते.

- मेधा सिन्नरकर, प्राचार्या, लक्ष्मणराव आपटे प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय

नीट, जेईई प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या खासगी शिकवण्यांकडून विद्यार्थ्यांना अकरावीसाठी ठराविक महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सांगण्यात येते. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यास महाविद्यालयात जाण्याची कोणतीही अट नाही, अशी हमी देण्यात येते. त्यामुळेच अगदी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच ९६ टक्के, ९८ टक्के असणारे विद्यार्थीदेखील अशा साधारण जेथे पुरेशा सुविधाही उपलब्ध नाहीत, अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेशाला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.

- सुरेश जैन, अध्यक्ष, महाराष्ट्र नागरी कृती समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com