भावी शिक्षकांच्या सहनशीलतेची परीक्षा; TET ची तारीख चौथ्यांदा बदलली

राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’चे आयोजन ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदsakal media

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी-२०२१) वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. या आधीच्या वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर रोजी होणारी ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल करण्यात आल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून असंतोष व्यक्त होत आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’चे आयोजन ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. परंतु या तारखेला देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक आहे. ही बाब विचारात घेऊन ‘टिईटी’ परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

परीक्षा परिषदेने सुरवातीला १० ऑक्टोबर रोजी ‘टीईटी परीक्षा २०२१’ घेण्याचे नियोजन केले होते. परंतु या तारखेला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आल्याने टीईटीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानंतर ही परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. परंतु आरोग्य विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा होणार असल्याने पुन्हा ‘टीईटी’ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून ही परीक्षा ३० ऑक्टोबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले. आता देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडूणक ३० ऑक्टोबर या तारखेला असल्याने पुन्हा एकदा ‘टीईटी’च्या परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे.

‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’चे सुधारित वेळापत्रक :

कार्यवाही : कालावधी

प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : २६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-एक : २१ नोव्हेंबर (वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी १)- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-दोन : २१ नोव्हेंबर (वेळ : दुपारी २ ते सायंकाळी ४.३०)

‘टीईटी’ परीक्षेचे महत्त्व :

इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठीच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते.

‘‘सातत्याने परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला जात असल्याने यातून प्रशासनाचे ढिसाळ नियोजन समोर येत आहे. परिणामी उमेदवारांची मानसिकता खराब होत आहे. सरकार उमेदवारांच्या भावनेशी खेळत असून उमेदवारांना सातत्याने मानसिक ताणाचा सामना करावा लागत आहे.’’

- संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डी टी एड, बी एड स्टुडंट असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com