दहावीच्या निकालानंतर लगेच येतो तो टप्पा म्हणजे, अकरावी केंद्रीय प्रवेश पद्धतीचा. अतिशय सुलभ आणि समजायला सोपी अशी, अकरावीची प्रवेश पद्धत आहे. कोरोनामुळे यावर्षी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. आपल्याला त्यासाठी घराबाहेर अजिबात जायचे नाही. आपण जे मार्गदर्शन केंद्र निवडाल त्या केंद्रातून ई मेलद्वारे अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रत्येक टप्पा पूर्ण करायचा आहे. यापूर्वीच आपण प्रवेश अर्जाचा भाग एक आपल्या शाळेमार्फत भरून पूर्ण केलेला असणार आहे, त्याशिवाय भाग दोन भरता येणार नाही. या प्रवेश पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मागेल त्याला प्रवेश. (अर्थात प्रवेशाच्या अटी महात्त्वाच्या आहेत.)
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भाग एक भरत असताना आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड केलेली असणार किंवा आता करावयाची आहेत. त्या त्या संवर्गातील सक्षम अधिकाऱ्याचा दाखला देणे आवश्यक आहे. ही प्रवेश प्रक्रिया घटनेतील संविधानाच्या अटी शर्तीनुसार राबविली जाते. त्यात अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग, आर्थिक मागास वर्ग इत्यादी सर्व आरक्षणानुसार ही प्रक्रिया राबविली जाते. यावर्षी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी 16 टक्क्यांऐवजी बारा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. तसेच अपंग व दिव्यांगासाठी तीनऐवजी चार टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणाबरोबर समांतर आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. त्यामध्ये अल्पसंख्यांक कोटा 50 टक्के, व्यवस्थापन कोटा 5 टक्के, इनहाऊस कोटा 10 टक्के, आजी माजी सैनिक 5 टक्के, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या खेळाडूंसाठी पाच टक्के, अपंग व दिव्यांग चार टक्के, महिला 30 टक्के, भूकंप व प्रकल्पग्रस्त पाच टक्के आणि अनाथ मुला-मुलींसाठी एक टक्का आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. वरील प्रकारच्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर त्या त्या सक्षम अधिकाऱ्याचे पत्र/दाखला अपलोड करणे आवश्यक आहे.
- कोण आहेत नवं शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष के कस्तुरीरंगन?
या प्रवेश प्रक्रियेमध्ये गृहविज्ञान, रात्र महाविद्यालय, तांत्रिक विद्यालय आणि सैनिकी विद्यालय यांचा समावेश नाही. या प्रवेश प्रक्रियेची सुरूवात झिरो राऊंडपासून सुरू होते. त्यामध्ये अल्पसंख्याकांचे प्रवेश, इनहाऊस कोटा आणि व्यवस्थापन कोटा यांचे प्रवेश होणार आहेत त्यानंतर नियमित प्रवेश फेरीला सुरूवात होईल. बऱ्याच जणांना इनहाऊस कोटा म्हणजे काय माहीत नसते. हा कोटा म्हणजे ज्या शैक्षणिक संस्थेची एकापेक्षा जास्त कनिष्ठ महाविद्यालये आहेत, त्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये त्याच संस्थेच्या विद्यालयातून जे दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांच्यासाठी हा कोटा असतो. या कोट्यातून प्रवेश घेतल्यास पुढच्या कोणत्याच फेरीमध्ये आपल्याला भाग घेता येणार नाही.
1. द्विलक्षी अभ्यासक्रमाचे (बायफोकल) प्रवेश नियमित फेरीमध्ये समांतर प्रवेश प्रक्रिया म्हणून करण्यात येणार आहेत. त्यासाठी सद्यस्थितीत असलेले अन्य नियम लागू राहतील.
2. प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य (फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह) ही फेरी यावर्षी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी गरजेनुसार अतिरिक्त विशेष फेरीची प्रक्रिया राबविण्यात येईल.
3. प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीमध्ये येऊ शकतील. त्याचप्रमाणे घेतलेले प्रवेश रद्द केलेले तसेच शाखा/महाविद्यालय बदल करू इच्छिणारे विद्यार्थी आधीचा प्रवेश रद्द करून विशेष फेरी-1मध्ये सहभागी होऊ शकतील.
4) पुणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून चालविण्यात येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील 50 टक्के जागा इनहाऊस कोटा अंतर्गत, त्या महानगरपालिका यांच्या माध्यमिक शाळांमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
5) कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना छापील पुस्तिका न देता डिजिटल स्वरुपात माहिती पुस्तिका देण्यात आली आहे. ही पुस्तिका पीडीएफ बुलेट स्वरूपात ऑनलाईन प्रणालीवर तसेच मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाईल.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर पोस्टिंग झालेल्या टीना डाबी ठरल्या पहिल्याच IAS
पसंतीक्रम भरताना घ्यावयाची काळजी
आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करताना पालक व विद्यार्थी यांनी खालील गोष्टींचा विचार करावा
(अ) संबंधित कनिष्ठ महाविद्यालय अनुदानित/विनाअनुदानित/ सेल्फ फायनान्स यापैकी कोणते आहे. विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाची फी थोडी जास्त असते. (ब) कनिष्ठ महाविद्यालय फक्त मुलांचे/मुलींचे अथवा को- एज्युकेशन यापैकी कोणत्या कॅटेगिरीमधील आहे?
(क) अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची फी इतरांपेक्षा तुलनेने कमी असते.
(ड) आपल्याला हवे असलेले विषय त्या महाविद्यालयात शिकविण्याची सोय आहे का ? उदा. बायफोकल किंवा भाषा ( जर्मन/फ्रेंच ) किंवा गणित, जीवशास्र.
(इ) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या महाविद्यालयाचे त्या शाखेतील कटऑफ गुण (म्हणजे गेल्या वर्षी शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश घेताना असलेले गुण.)
(ई) आपल्या घरापासून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाचे अंतर आणि रस्त्यावरची रहदारी.
वरील ठळक गोष्टींचा पसंतीक्रम भरताना विचार केल्यास गैरसोय होणार नाही. यातील प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे काळजी घ्यावी. पहिल्या क्रमांकाची पसंती असलेले महाविद्यालय मिळाले, तर त्या ठिकाणी प्रवेश घेणे अपरिहार्य आहे. कारण पुढच्या नियमित फेऱ्यातून असे विद्यार्थी बाद होतात. दोन ते दहा पसंतीक्रम महाविद्यालय मिळाल्यास, आपला प्रवेश आपण घ्यायचा किंवा नाही हे ठरवू शकता. कारण असे विद्यार्थी पुढच्या प्रवेश फेरीसाठी पात्र ठरतात. दुसऱ्या किंवा त्याच्या पुढच्या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्याला आधी दिलेले पसंतीक्रम बदलता येऊ शकतात. बदल केला नाही, तर त्यापूर्वी दिलेले पसंतीक्रम गृहीत धरले जातात.
आपला लॉग इन आणि पासवर्ड कोणाशी शेयर करू नका. जपून ठेवा. विद्यार्थी/पालकांना काही अडचण असल्यास आपण निवडलेल्या मार्गदर्शन केंद्राची मदत घ्या. त्यांना ई मेलही करू शकता. पण कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयांमध्ये जावयाचे नाही हे नक्की लक्षात ठेवा. 'नो युवर एलिजिब्लिटी' (Know your eligibility) या मोड्यूलमधून आपल्याला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेणे सोयीस्कर आहे याची मदत नक्की होणार आहे. त्यामुळे असलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यावा.
- डॉ. जगदीश चिंचोरे (माजी सदस्य, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.