HSC Supplementary Examination : पुरवणी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जागा वाढवून द्याव्यात

बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल लागण्याआधीच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे.
HSC Supplementary Examination
HSC Supplementary Examinationesakal

पुणे - बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल लागण्याआधीच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे सीईटी सेलने घेतलेल्या प्रवेश परीक्षेत पात्र ठरल्यानंतरही बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल वेळेत न लागल्याने काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या जागा वाढवून द्याव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका एका पालकाने मुंबर्इ उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभूवन यांच्या विरोधात ॲड. जान्हवी भोसले यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबर्इ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या न्यायालयात याचिकेवर सुनावणी होणार आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच राज्यात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विधी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रीया सीईटी सेलने आटोपली. त्यामुळे सीर्इटीत पात्र ठरूनही विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकलेला नाही.

तंत्रनिकेतन व्यावसायिक अभ्यासक्रमांसह पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. तर काही अभ्यासक्रमांना मुदतवाढ दिली असली, तरीही जवळपास सर्वच महाविद्यालयांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा भरल्या आहेत. त्यामुळे केवळ प्रवेशासाठी मुदतवाढ देऊन उपयोग नाही, तर महाविद्यालयांमधील प्रवेशाच्या जागा वाढविल्या पाहिजेत.

विधी, बी.एड. आणि बी.पी.एड साठी नव्याने प्रवेशप्रक्रिया सुरू झाली नाही, याकडे याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रवेशासाठी जागा वाढविण्यात याव्यात आणि या जागांवर पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी देखील मागणी याचिकेतून केली आहे.

पुरवणी परीक्षा घेण्याला अर्थ काय?

बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्वरित पुरवणी परीक्षा घेण्यात येते. मात्र सर्व प्रवेश प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर पुरवणी परीक्षेचा निकाल लागत असेल तर या परीक्षेला काय अर्थ? बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी मोठ्या जोमाने अभ्यास करतात. त्यानंतर सीर्इटीची तयारी करतात. दोन्ही परीक्षेत पास होवूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही, तर त्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

याचिकेत करण्यात आलेल्या मागण्या :

- उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ‘कॅप’ फेरी खुली करावी

- व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाच्या जागा वाढवून देण्यात याव्यात

- पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवाव्यात

- ‘कॅप’ फेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळावा

- यापुढे पुरवणी परीक्षेचा निकाल ‘कॅप’अंतर्गत प्रवेश फेऱ्या पूर्ण होण्याआधी लावावा

‘बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येते. जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच शैक्षणिक वर्षात प्रवेश देणे, हा पुरवणी परीक्षेचा उद्देश आहे. परंतु यंदा हा उद्देशच साध्य झालेला नाही.

त्यामुळे सीईटीत पात्र ठरून आणि पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. या ताणातून विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याचे प्रकार देखील घडले आहेत. अनेक विद्यार्थी आहेत की, ज्यांना या सर्व प्रवेश प्रक्रियेची माहिती देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष आणि सीर्इटीसाठी केलेली तयारी देखील वाया जाते.’

- ॲड. जान्हवी भोसले, याचिकाकर्त्यांचे वकील

बारावीची मुख्य परीक्षेत किंवा पुरवणी परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि सीर्इटीत पात्र ठरवून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अद्याप प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी आपल्या संपूर्ण नावासह त्यांची प्रतिक्रिया ८४८४९७३६०२ या व्हॉटस्‌ॲप क्रमांकावर कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com