१ जानेवारी १८४८ रोजी त्यांनी पुणे येथे भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली.
- प्रशांत सरुडकर
बहुजनांचा आधारस्तंभ असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील ‘नायगाव’ येथे झाला. पुढे त्यांचा विवाह जोतीरावांबरोबर झाला. शिक्षणाशिवाय समाज बदलणार नाही, या भावनेतून १ जानेवारी १८४८ रोजी त्यांनी पुणे येथे भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली.
या काळात अनंत अडचणी आणि यातना त्यांच्या वाट्याला आल्या. ही शाळा चालविण्यासाठी सावित्रीबाईंनी मुलांची अंगडी-टोपडी शिवली. खडकवासल्याच्या धरणावर खडी फोडण्याचे कामही काही काळ त्यांनी केले. शाळेला शिक्षक मिळेना. शिक्षिकेची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. बहुजन समाजातील विद्यार्थिनींना शिकविण्यासाठी सनातन्यांचे बोलणे, शेणा-चिखलाचा मारा सहन करावा लागला.
मात्र, आपल्या कार्यापासून त्या दूर गेल्या नाहीत. बालहत्या प्रतिबंधक गृहाबाबतचे त्यांचे कार्य सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहे. या प्रतिबंधकगृहात विधवांच्या अनेक मुलांचा सांभाळ त्यांनी केला. या काळात कष्ट करून पैसा उभा केला व दीन-दलितांसाठी मुक्तहस्ताने खर्च केला. सावित्रीबाईंनी काव्यफुले, बावन्नकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले.
देशात १८९७मध्ये प्लेगची साथ आली. गोरगरीब बांधवांविषयी अत्यंत करुणा त्यांच्या मनात वसत होती. मुलगा डॉ. यशवंताच्या साहाय्याने पीडितांची सेवा त्या करत होत्या. हा जीवघेणा आजार आहे, असा सल्ला अनेकांनी त्यांना दिला. मात्र, सावित्रीबाई प्लेग पीडितांची सेवा करतच राहिल्या आणि एकेदिवशी त्यातच त्यांचा अंत झाला. समाजसेवेसाठी सर्व जीवन आणि मृत्यूही समाजसेवा करता करताच.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.