कर्मगतीला योग्य दिशा देण्याचा काळ...

‘कर्मणा गहनो गति’ म्हणजे कर्माची गती समजण्याच्या आवाक्याबाहेरची आहे असे श्रीमद्भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेले आहे आणि प्रत्यक्षातही आपण हेच अनुभवत असतो.
कर्मगतीला योग्य दिशा देण्याचा काळ...

‘कर्मणा गहनो गति’ म्हणजे कर्माची गती समजण्याच्या आवाक्याबाहेरची आहे असे श्रीमद्भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेले आहे आणि प्रत्यक्षातही आपण हेच अनुभवत असतो. अगदी जीवाभावाची आणि एकाच मातापित्यांच्या पोटी जन्माला आलेली चार भावंडे स्वभावाने, चेहऱ्यामोहऱ्याने, सवयीने आणि जगत असलेल्या जीवनाने वेगवेगळी असतात. जगातील प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा वेगळी असते कारण प्रत्येक जीव स्वतःचा असा एक प्रोग्रॅम घेऊन आलेला असतो.

आपल्यावर आपल्या पालकांच्या गुणसूत्रांचा थोडा परिणाम असतो, त्यापेक्षा थोडा अधिक परिणाम आतल्या जिवाने आपल्याबरोबर आणलेल्या वेगळेपणाचा म्हणजे त्याच्या मूळ प्रोग्रॅमचा असतो. पण सर्वांत जास्त प्रभाव आपण करत असलेल्या कर्माचा असतो. आपल्याला आयुष्यात आनंद हवा असेल, आपल्या मनाप्रमाणे व्हावे असे वाटत असेल तर आपले वागणे सुधारणे आवश्‍यक असते. त्यासाठी घरातील अनुभवी व्यक्ती, गुरुजन, शास्त्रवचन या गोष्टी असतात.

एखादी व्यक्ती समाजाचे ऐकत नसेल, वडीलधाऱ्यांचे, गुरुजनांचे ऐकत नसेल, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या स्वकीयांचे व कुटुंबीयांचेही ऐकत नसेल, स्वतःचाच हेका चालवत असेल, मला एकट्यालाच अक्कल आहे असे समजून त्यानुसार कर्म करत असेल तर येणाऱ्या परिणामांची जबाबदारी त्याच्यावरच असते. परंतु आपण ठरवलेल्या बऱ्याच गोष्टीही आपण करत नाही.

मी उद्यापासून लवकर उठणार असे कोणी ठरवतो, परंतु सकाळी जाग आल्यावर घडाळ्यात नऊ वाजलेले पाहून ‘बापरे, एवढा उशीर कसा झाला’, असे म्हणून उद्यापासून लवकर उठण्याचा निर्णय पुन्हा केला जातो. परंतु ठरविल्यानुसार वागायची सवय लावलेली नसल्याने तसे घडत नाही.

जीवन सुधारायचे असेल तर स्वभाव बदलायला हवा आणि स्वभाव बदलायचा असेल तर आपले अस्तित्व ज्या द्रव्यावर अवलंबून आहे, त्यावर म्हणजे आपल्या गुणसूत्रांवर संस्कार करण्याचा उपयोग होऊ शकतो. उदा. आई-वडिलांकडून एखाद्याला दमा आलेला असला तरी पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसात त्रास नसला तरी औषध घेण्यास सुरुवात करणे, विशिष्ट वयानंतर रसायने घेणे सुरू करणे, रात्रीच्या वेळी थंड गोष्टी खाणे टाळणे, वाऱ्यात ऊबदार कपडे घालून स्वतःचे संरक्षण करणे वगैरे गोष्टी आचरणात आणल्या तर आई-वडिलांकडून आलेल्या गुणसूत्रांचा प्रभाव टाळता येणे शक्य असते.

किंवा आपण एखाद्या व्यक्तीवर रागावलेले असू पण त्या व्यक्तीला थप्पड मारता येत नसल्याने तीच थप्पड दारावर मारून दार जोरात ढकलून राग व्यक्त केला जातो. त्याचप्रमाणे एक प्रतिकृती तयार करून त्यावर काम करून आडवळणाने किंवा एका वेगळ्या मार्गाने परिणाम मिळविता येतात.

यादृष्टीने पार्थिव गणेशाची स्थापना करून गणेशोत्सवाचे आयोजन करून मूलाधारातील गणपतीला नमन केले जाते. घर बांधायचे असले तर आधी पाया खोदावाच लागतो तशाच प्रकारे आपल्याला गुणसूत्रांवर काम करायचे असेल तर प्रथम श्रीगणेशांना नमन करण्याचा गणेशोत्सव साजरा करावाच लागतो.

आपले शरीर मुळात पंचतत्त्वांचे तयार झालेले आहे. पृथ्वीतत्त्व हे आपल्यासाठी सर्वप्रथम आहे. म्हणून गणेशोत्सवातील श्रीगणेशाची मूर्ती पार्थिव असते. ही आहे मूलाधाराची देवता. नंतर येते जलतत्त्व. मुख्यतः पृथ्वीतत्त्व व जलतत्त्व या दोन तत्त्वांनी शरीर बांधलेले आहे. मानवी शरीरात जलतत्त्व ७० टक्के असते. पृथ्वीतत्त्व व जलतत्त्वांच्या आधारे राहतो अग्नी.

शरीराच्या पोकळ्या हे आकाशतत्त्व आणि या पोकळ्यांमधून होणारे चलनवलन हे वायुतत्त्व. पंचतत्त्वांमधील पृथ्वीतत्त्व आणि जलतत्त्व अशी असतात की जी आपल्याला समजू शकतात, दिसू शकतात, त्यांच्यावर प्रयोग करता येऊ शकतो. गणेशमूर्ती नदीतील ओल्या मातीपासून बनविलेली असते. ही माती नदीतील पाण्यामुळे शुद्ध झालेली असते, त्यामुळे या मातीवर संस्कार होऊ शकतात.

मातीचा गणपती तयार केला की दहा दिवसांच्या उत्सवात जे संस्कार गणेशांच्या मूर्तीवर केले जातात ते जणू आपल्या शरीरावर व्हावेत, त्यांच्या योगे प्राणशक्ती वाढावी या दृष्टीने पूजा योजलेल्या असतात. ज्ञानाची प्रतिष्ठा कळावी या दृष्टीने कार्यक्रम आयोजित केले जातात. चांगल्या गोष्टींचे चिंतन व्हावे या दृष्टीने प्रवचने आयोजित केली जातात.

मनावरचा ताण हलका व्हावा या दृष्टीने मनोरंजनाचे कार्यक्रम केले जातात. षड्ररसांपैकी मुख्य असलेले मधुर रसयुक्त मोदक नैवेद्य म्हणून केले जातात. ‘मुद्’ म्हणजे आनंद व ‘क’ म्हणजे देणारा म्हणजे आनंद देणारा तो मोदक. यानंतर गणपतीचे पाण्यात विसर्जन केले जाते.

पृथ्वीतत्त्व व त्याबरोबर असलेले जलतत्त्व अशा जड तत्त्वांचे विसर्जन होते मात्र ‘श्रीगणेश’ या सूक्ष्म तत्त्वाचे व त्यावर झालेल्या संस्कार लहरींचे विसर्जन होत नाही. नंतर हे पाणी यथावकाश बाष्परूपाने संपूर्ण विश्र्वात पसरते, त्यावरच्या संस्कारांचा संपूर्ण विश्र्वाला फायदा होतो आणि मग ते पाणी पावसाच्या रूपाने आपल्याला परत मिळते. गुणसूत्रांवर वेगळा संस्कार करणे हा गणेशोत्सवाचा खरा उद्देश.

गुणसूत्रांवर असलेल्या डीएन्एपासून आर्‌एन्‌ए तयार होत असतात. प्रतिकृतीस्वरूप असणाऱ्या आर्‌एन्‌एमधे बदल करण्याने आपण आपले जीवनमान बदलून आपल्याला हवे तसे भविष्य घडवू शकतो. अनंतचतुर्दशीपर्यंत संस्कारित झालेल्या या गुणसूत्रांप्रमाणेच आपल्या पूर्वजांकडून आलेल्या गुणसूत्रांवर संस्कार करण्यासाठी, त्यांना शुद्ध करण्यासाठी आपल्या शास्त्रांमधे पितृपक्षाची योजना केलेली आहे.

जन्माला आलेला जीव जीवनात दुःख का भोगतो या प्रश्नाचे उत्तर सहसा दिले जाते की कदाचित त्याने पूर्वीच्या जन्मात इतरांच्या सुखाची काळजी घेतली नसेल. तर मग निदान या जन्मात तरी चांगली कर्मे करण्यास सुरुवात करता येऊ शकेल का नाही? अशी चांगली कर्मे करण्यासाठी आवश्‍यक असलेले प्रेम, श्रद्धा, भक्ती या गोष्टी विचारात घेऊन जीवाने आपली वागणूक बदलली तर गुणसूत्रांमध्ये आर्‌एन्‌एमार्फत बदल होऊ शकतात जे कर्मगतीसाठी आवश्‍यक असतात. ज्ञानाची महती अगाध आहे.

आपली शास्त्रे कोणी पैसे मिळविण्यासाठी पेटंट वगैरे घेऊन केलेली नाहीत; तर परंपरेने मनुष्यजातीच्या कल्याणासाठी अनेकांच्या संयुक्त प्रयत्नांतून लावलेले शोध संकलित करून ही शास्त्रे तयार झालेली आहेत. असे वागावे, असे करावे अशा अनेक गोष्टी या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत. या शास्त्रांचा उपयोग करून घेतला, त्यातील ज्ञानाचा आदर केला तर अख्खे आयुष्य सुधारू शकते, जीवाच्या कर्मगतीला योग्य दिशा मिळू शकते.

पितृपक्षाच्या निमित्ताने पूर्वजांच्या इच्छेची कदर केली, त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे व्यवहार आखला, त्यांच्या ऋणातून मोकळे होण्यासाठी काही दानधर्म केला, स्वतः सन्मार्गाची कास धरण्याचा निश्र्चय केला आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित केले तर हे साध्य होऊ शकेल.

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com