#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

question answer
question answer

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. माझे वय ६५ वर्षे आहे. मी पाच-सहा महिन्यांपूर्वी घरात पडले. डॉक्‍टरांकडून जाऊन तपासणी केली असता, मान व पाठ यामधील मणक्‍यात दोन ठिकाणी छोटे फ्रॅक्‍चर आहे. यासाठी त्यांनी दिलेली औषधे घेतली, पण अजून त्रास होतो आहे. सकाळी उठताना त्या ठिकाणी थोडे दुखते. कृपया आयुर्वेदिक उपचार सुचवावा.
...भाग्यश्री

उत्तर - पाठीच्या कण्याला, विशेषतः ज्या ठिकाणी वेदना होतात त्या ठिकाणी दिवसातून दोन-तीन वेळा ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी खारकेचे चूर्ण टाकून उकळून घेतलेले दूध शतावरी कल्प मिसळून घेण्याचा उपयोग होईल. काही दिवस संतुलनच्या ‘कॅल्सिसॅन’ गोळ्या, ‘वातबल’ गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. झालेले फ्रॅक्‍चर भरून यावे, यासाठी विशेष प्रकारचे लेप करता येतात. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली असे लेप लावण्याने, दशमूळ सिद्ध तेलाच्या बस्ती घेण्यानेही बरे वाटेल. खसखस, नाचणी सत्त्व, गहू, तूप, खारीक वगैरे गोष्टींचा आहारात समावेश असणे चांगले. 

मी सकाळी एक लिटर पाणी पितो. सकाळचा नाश्‍ता केला की मग मात्र पचनक्रिया बिघडते. ॲसिडिटीची गोळी घेतली, तरच बरे वाटते. पोटाची सोनोग्राफी केली, त्यात काही सापडले नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
...बाबासाहेब

उत्तर - सकाळी इतके जास्त पाणी न पिता फक्‍त एक कपभर कोमट-गरम पाणी पिण्याने पचन सुधारण्यास मदत मिळेल. सकाळचा नाश्‍ता साधारण आठ-नऊच्या सुमाराला करणे चांगले. त्यामध्ये बेकरी उत्पादने नसावीत, तर काही तरी गरम ताजा नाश्‍ता असावा. यादृष्टीने तांदळाच्या रव्याचा उपमा, सांजा, मऊ खिचडी, मऊ भात, मूग-तांदळाच्या पिठाचे धिरडे या प्रकारे योजना करता येईल. नाश्‍त्याच्या पूर्वी ‘संतुलन पित्तशांती’ गोळी घेण्याचाही उपयोग होईल. ॲसिडिटीच्या गोळ्या घेण्याची गरज लागणार नाही, यासाठी आहारयोजना नीट करणे आवश्‍यक होय. 

माझी मुलगी १६ वर्षांची आहे. तिचे जेवण साधे असेच आहे. बाहेरचे खाणे कधीतरीच होते. तरीही तिचे वजन वाढत चालले आहे. याचे कारण काय असावे? शरीरात वात भरल्यासारखा वाटतो. कृपया मार्गदर्शन करावे.
...सुखदा

उत्तर - या वयात वजन वाढण्यामागे बहुधा स्त्री-असंतुलन हे कारण असू शकते. प्रश्नात आपण मुलीच्या पाळीसंबंधी उल्लेख केलेला नाही. पाळीसंबंधी काही त्रास असल्यास लवकरात लवकर तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक औषधे सुरू करणे चांगले. बरोबरीने ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे, आठवड्यातून दोन वेळा ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे हेसुद्धा चांगले. वाढलेला वात व मेदधातू कमी करण्यासाठी रोज रात्री ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेला’ने अभ्यंग करणे, रोज नियमित चालणे, योगासने, विशेषतः सूर्यनमस्कार करणे, स्नानाच्या वेळी ‘सॅन मसाज पावडर’सारखे उटणे अंगाला चोळून लावणे, जेवणाच्या वेळा नियमित ठेवणे, विशेषतः रात्रीचे जेवण लवकर करणे, हे उपाय योजता येतील. अंडी, मांसाहार, चीज, चवळी, वाटाणा, पावटा, राजमा वगैरे पचण्यास अवघड पदार्थ आहारातून टाळणे आवश्‍यक.

माझे वय ३५ वर्षे आहे. मला रोज थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. पाळीमध्ये अंगावरून कमी प्रमाणात जाते. तरी यावर औषध सुचवावे.
...सायली

उत्तर - थायरॉईड ग्रंथीच्या असंतुलनावर प्रकृतीनुरूप औषध घेणे गरजेचे असते. असा अनुभव आहे, की योग्य औषधयोजना केली, तर हलके हलके गोळीचे प्रमाण कमी करता येऊ शकते. अंगावरून कमी जाते आहे त्यावर रोज सकाळी एक चमचा कोरफडीचा ताजा गर घेण्याचा, तसेच कोरफड व अन्य द्रव्यांपासून बनविलेले ‘संतुलन फेमिनाईन बॅलन्स’ हे आसव दोन-दोन चमचे या प्रमाणात दोन्ही जेवणांनंतर घेण्याचा उपयोग होईल. ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे, धात्री रसायन, शतावरी कल्प घेणे याचाही उपयोग होईल. स्वयंपाक करण्यासाठी साधे खडा मीठ किंवा सैंधव मीठ वापरणे, रोज सकाळ-संध्याकाळ पाच मिनिटांसाठी ज्योतित्राटक करणे हेसुद्धा स्त्रीसंतुलनासाठी साहायक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com