Ganesh Visarjan 2022 : अनंत चतुर्दशीचा संबंध आहे भगवान विष्णूंशी, जाणून घ्या कथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Visarjan 2022

Ganesh Visarjan 2022 : अनंत चतुर्दशीचा संबंध आहे भगवान विष्णूंशी, जाणून घ्या कथा

Ananta Chaturdashi Katha : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा संबंध थेट महाभारताच्या काळाशी जोडला जातो. अनंत चतुर्दशीलाही तसंच विशेष महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. यंदा अनंत चतुर्दशी ९ सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी गणशोत्सव संपून गणेश मूर्ती विसर्जन केले जाते.

धार्मिक मान्यता

हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्व आहे. पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे. या धाग्यात १४ गाठी मारल्या जातात. हा धागा रेशीम किंवा कापसाचा बनवला जातो. स्त्रिया डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात हा अनंत धागा बांधतात. अनंत धागा बांधल्याने सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे.

अनंत चतुर्दशीचे महत्त्व

अनंत चतुर्दशी साजरी करण्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते. त्यानंतर त्यांना १२ वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात घालवावे लागले. या काळात पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते.

त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांला आपले राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे. तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा. हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल. यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला व्रताचे महत्त्व सांगणारी कथाही सांगितली. यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले.

अनंत चतुर्दशीची कथा

प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव सुमंत आणि पत्नीचे नाव दिक्षा होते. त्या दोघांना सुशीला नावाची पुण्यवान मुलगी होती.सुशीलाचा विवाह ब्राह्मण कौंदिन्य ऋषीशीही झाला. पत्नीसह निघाला. वाटेत रात्र झाली म्हणून तो एका नदीकाठी थांबला आणि संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण करू लागला.

त्याचवेळी सुशीलाला अनेक स्त्रिया कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करताना दिसल्या. सुशीलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तिला भगवान अनंतांची पूजा आणि त्याचे महत्त्व सांगितले. सुशीलानेही त्याच वेळी व्रत केले आणि 14 गाठींचा धागा बांधून कौंदिन्याकडे आली. कौंदिन्याने सुशीलाला त्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशीलाने त्याला सर्व प्रकार सांगितला. कौंदिन्याने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला अनंत धागा काढून आगीत टाकला. यानंतर त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुःखी राहू लागला.

खूप दिवस उलटल्यानंतर कौदिन्याने सुशीलाला या गरिबीचे कारण विचारले तेव्हा तिने भगवान अनंतांचा धागा जाळल्याची आठवण करून दिली. हे ऐकून कौंडिन्य अनंत सूत्र घेण्यासाठी वनाकडे निघाला. अनेक दिवस जंगलात शोधाशोध करूनही जेव्हा त्याला अनंत सूत्र सापडले नाही तेव्हा तो निराशेने जमिनीवर कोसळला. त्यानंतर तेथे भगवान विष्णू प्रकट झाले

कौंदिन्याला उद्देशून म्हणाले. हे कौदिन्या तू माझा तिरस्कार केला होता म्हणूनच तुला खूप त्रास सहन करावा लागला. आता तुला पश्चात्ताप झाला आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचे व्रत कर. १४ वर्षे उपवास केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील. त्यानंतर कौंदिन्याने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याची सर्व संकटातून सुटका झाली.