नाशिक : बुद्धीदेवता गणरायाच्या उत्सवकाळात गणेशयागाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व दिले जात असले, तरीही यागासाठीची निसर्गातील सामग्री पुन्हा निसर्गाला समर्पित करणे, हे या निसर्गाधिष्ठित पूजनात महत्त्वाचे आहे.
उत्सवाला सुरवात झाल्याच्या तीन दिवसांमध्ये शहरातील वीस मंडळांकडून निसर्गाधिष्ठित गणेशयाग करत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. इच्छापूर्ती, संकट हरणासाठी गणेशयाग उपयुक्त ठरत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत शंभराहून अधिक गणेशयाग नाशिक शहरात होतील, अशी माहिती वेदाचार्य रवींद्र पैठणे यांनी दिली.
कुठल्याही शुभकार्यात पूजनाचा प्रथम मान गणरायांना आहे. त्यातच गणेशयागाला महत्त्व दिले जाते. मंत्रोच्चारात व उत्साहपूर्ण वातावरणात गणेशयागाचे विधी होतात. यागासाठी वापरात येणारी सामग्री ही निसर्गाचा घटक असून, तिचे विलीनीकरण निसर्गात केले जाते. या पूजनात निसर्गाने जे दिले ते विधीतून निसर्गाला परत केले जाते.
यागाचे अनादीकाळापासून महत्त्व
गणेशयागात अथर्वशीर्षाचे हवन केले जाते. वेद, पुराणात अग्निहोत्राचा उल्लेख आढळतो. पूर्वी रोज घरोघरी अग्निहोत्र होत. पुढे काही कुटुंबातच ते सुरू राहिले. अभ्यासकांच्या माहितीनुसार यज्ञामध्ये जाळल्या जाणाऱ्या समिधांतून वातावरणाची शुद्धी होत असल्याने यागाला अनादीकाळापासून महत्त्व आहे.
आंबा, वड, पिंपळ, जांभूळ, पळस, रुई, आघरडा अशा बारा प्रकारच्या समिधांचा वापर यज्ञात होत असल्याने त्यांच्या पवित्रेमुळे उत्सर्जित होणाऱ्या धुरातून वातावरण शुद्धी होण्यास मदत होते. घरात कीटक, डासांना अटकाव होत असल्याने आरोग्य चांगले राहाण्यास मदत होते.
कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंबांनी घरातील वातावरण शुद्धीसाठी तसेच कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी कापराचे ज्वलन केल्याचे समोर आले होते. अगदी दुष्काळात पावसासाठी केला जाणारा पर्जन्ययागापासून अन्य वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी ऋषिमुनींनी याग केल्याचे दाखले वेद, पुराणांमध्ये आढळतात.
असा होतो गणेशयाग
गणेशयागाप्रसंगी गणपती पूजनाचा संकल्प केला जातो. यानंतर पुण्याहवाचन, मातृका स्थापन, आचार्यादि ब्राह्मण वरण, दीगरक्षण, व पंचगव्यकरण विधी केला जाते. सर्वतोभद्र मंडलावर ७७ देवतांची स्थापना करताना कलशासह सुवर्ण गणेश प्रतिमा/गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. पुष्प, फल आणि दूर्वापत्र वाहिले केले जातात.
हजार दूर्वांनी अर्चन केले जाते. नवग्रहांची स्थापना करून हजार मोदकांचे हवन केले जाते. बलिदान पूर्णाहुतीने यागाची सांगता होते. या पूजेदरम्यान अथर्वशीर्षाचे दहा खंडात्मक मंत्राने आहुती दिली जाते. लाज्या (साळीच्या लाया), लाल अक्षता आणि लाडू, तीळ पळसाच्या समिधा तुपात बुडवून आहुती दिली जाते. गणेशाला गायीच्या दुधाने सहस्त्रावर्तनपण केले जाते.
यागादी कर्माचे आरोग्यसंवर्धन
गणेशयाग पूजन करताना जी सामग्री वापरली जाते, त्यात तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे आचमन केले जाते. पंचगव्य प्राशन, पूजेच्या सुरवातीला केले जाणारे प्राणायाम, न्यास हे आरोग्य आणि योगशास्त्राच्या माध्यमातून यजमानांचे आरोग्यसंवर्धन होत असते.
वेदविद्या प्रतिष्ठानतर्फे सिद्धिविनायकाला साकडे
कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगावर आलेले हे संकट दूर व्हावे, यासाठी पंचवटीतील महर्षी गौतम गोदावी वेद विद्या प्रतिष्ठानतर्फे मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीला साकडे घालण्यात आले होते. राज्यभरातून आलेले ५१ वैदिक पंडित यांनी चारही वेदांचे पठण करत पूजाविधी पार पाडली होती. कोरोनाकाळात निर्बंध लागू असताना मोठ्या कष्टाने ही पूजा यशस्वी करण्यात आली होती.
यज्ञाच्या महत्त्वाचा भगवद्गीतेत दाखला
भगवद्गीतेत 'यज्ञा भवति भूतानि पर्जन्याद्न संभवं' या श्लोकानुसार यज्ञ केल्याने पाऊस येतो, हे विज्ञानाने सुद्धा मान्य केलेला आहे. असे अनेक वैदिक परंपरा आपल्या आहेत. ज्यामध्ये ओतप्रोत विज्ञान भरलेलं आहे. गीताच दुसऱ्या अध्याय सांगते देवाचा निमित्ताने यज्ञामध्ये हवन केल्यास ती देवता प्रसन्न होते व आपले ईप्सित देते.
'अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः'
या तिसऱ्या अध्यायातील श्र्लोकानुसार यज्ञाने पाऊस होतो. अग्नीत विधिपूर्वक दिलेली आहुती सूर्यात स्थित होऊन सूर्याने वृष्टी होते. वृष्टीने अन्न उत्पादित होतो. पुढील चक्राबाबतची रचना विशद केलेली आहे. तिसऱ्या अध्यायातील या श्र्लोकांमध्ये यज्ञानचे महत्त्वदेखील विशद केलेले आहे.
"गणेशोत्सवात केलेल्या गणेशयाग विधीला धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. व्यवसाय, नोकरी, अभ्यास, करिअरमध्ये यशस्विवीतेसाठी भाविकांकडून गणेशयाग केला जातो. पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश या पूजेतून दिलेला आहे."
-वेदाचार्य रवींद्र पैठणे, प्रधान आचार्य व संस्थापक विश्वस्त, महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान
"वेद, पुराणांपासून अग्नी-यागाला विशेष महत्त्व असल्याचा उल्लेख आहे. पूर्वी घराघरांत अग्निहोत्र प्रज्वलित होते. कालांतराने हे प्रमाण घटून आज मोजक्या कुटुंबात अग्निहोत्र आहे. यागात वापरल्या जाणाऱ्या समिधेतून उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे वातावरण शुद्धी होत असल्याने शास्त्रीयदृष्ट्या यागाला महत्त्व आहे."
- अशोककाका कुलकर्णी (संचालक, धर्मज्ञानगंगा समूह)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.