सॅटेलाईट फोटोद्वारे गलवान खोऱ्यातील चीनचा खोटेपणा उघड

india, china, ladakh
india, china, ladakh

नवी दिल्ली- 15 जूनच्या रात्री भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यात भारताचे 20 जवान मारले गेले होते. भारतीय जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडल्याने आम्हाला हिंसक पाऊल उचलावे लागले असा कांगावा चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी करत आहे. मात्र, चीनने ठरवून भारतासोबत संघर्ष केल्याचं कळत आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षापूर्वी आणि संघर्षानंतर घेण्यात आलेल्या सॅटेलाईट फोटोद्वारे चीनने घडवून आणलेला संघर्ष पूर्वनियोजित असल्याचं सिद्ध होत आहे. 16 जून रोजी घेण्यात आलेल्या सॅटेलाईट फोटोंनुसार चीनने गलवान खोऱ्यात मोठ्या मशीनरी आणल्याचं दिसत आहे. जमीन सपाट करणे, रस्ता रुंदीकरण करणे आणि नदी प्रवाहावर तात्पुरता पुल बनवण्याचे काम चिनने या भागात केल्याचं स्पष्ट होत आहे. संघर्षाच्या एक आठवड्यापूर्वी गलवान खोऱ्यात फारशा हालचाली दिसत नाहीत. मात्र, त्यानंतर हालचाली वेगाने वाढत गेल्या. चीनने या काळात तात्पुरता रस्ता आणि नदीला अटकाव केल्याचं दिसत आहे. तसेच भारतीय हद्दीत तंबू आणि निगराणी पोस्ट उभारल्याचं दिसत आहे. 

15 जूनच्या संघर्षानंतर दोन्ही देशांचे सैनिक मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आले होते. यावेळी भारताचे 30-40 वाहने तर चीनचे 100 ते 110 वाहने घटनास्थळी आले होते. यावरुन चिनी सैन्य संघर्षाच्या तयारीत होतं असं स्पष्ट होतंय. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तंबू आणि निगराणी पोस्ट बनवले होते. यावेळी कर्नल संतोष बाबू आपल्या पथकासह पाहणीसाठी त्याठिकाणी गेले असता चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी मोठ्या प्रमाणात चिनी सैन्य घटनास्थळी उपस्थित होते. भारतीय सैन्यही काही वेळात घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे जवळपास 3 तास दोन्ही देशाच्या सैन्यामध्ये संघर्ष सुरु होता. जवळपास 900 सैनिक याठिकाणी जमा झाल्याचं सांगितलं जात आहे.

भारत आणि चीनमध्ये एलएसीवर गोळीबार किंवा स्फोटके न वापरण्याचा करार झाला आहे. त्यामुळे चीनने लोखंडी रॉड, काठ्या, तारांनी गुंडाळलेल्या लाकडाच्या साह्याने भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. 1967 नंतर पहिल्यांदाच चीन आणि भारतामधील संबंध टोकाला गेले आहेत. संघर्षासाठी चीनने भारतीय सैनिकांना जबाबदार धरले आहे. भारतीय सैन्य वारंवार प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडत असल्याचं चीनने म्हटलं आहे. दरम्यान, गलवान खोरे दोन्ही देशांसाठी महत्वाचे आहे. अक्साई चीनला जाणार मार्ग हा गलवान खोऱ्यातून जातो. त्यामुळे या क्षेत्रावरुन भारत आणि चीनमध्ये फार पूर्वीपासून वाद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com