Pm imran Khan Arnab chat
Pm imran Khan Arnab chat

'फॅसिस्ट मोदींनी भारत रसातळाला नेला'; अर्णबच्या खांद्यावरुन पाकने साधला PM मोदींवर निशाणा

इस्लामाबाद : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंतर एकच खळबळ माजली आहे. आधीच अडचणीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहेच मात्र यामुळे आता देशाची नाचक्की जगभरात होत आहे. देशातील विरोधी पक्षांनी याबाबत प्रश्नांची सरबत्ती उभी केली आहेच मात्र आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही आता गोस्वामी यांच्या या व्हायरल चॅटवरुन मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. या प्रकरणामुळे पाकिस्तानला भारतावर निशाणा साधायला आयते कोलित मिळाले आहे. 

इम्रान खान यांनी म्हटलंय की, 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना मी भारतामधील फॅसिस्ट असलेल्या मोदी सरकारनं देशातील निवडणुकीसाठी बालाकोट प्रकरणाचा वापर केला असल्यांचं म्हटलं होतं. एका भारतीय पत्रकाराच्या संवादातून हा नवीन खुलासा झाला आहे. हे पत्रकार त्यांच्या तापटपणामुळे ओळखले जातात. या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून मोदी सरकार आणि भारतीय माध्यमांमध्ये असलेले चुकीच्या संबंधदेखील चव्हाट्यावर आले आहेत. ज्यातून हेच दिसत आहे की, संपूर्ण खंडात अस्थिरता निर्माण होण्याच्या परिणामाकडे दुर्लक्ष करून निव्वळ निवडणूक जिंकण्यासाठी हे धोकादायक लष्करी धाडस केलं होतं. पाकिस्ताननं बालाकोट संकट जबाबदारीनं टाळलं. तरीही मोदी सरकार भारताचं रुपांतर वाईट देशामध्ये करत आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, भारत  पुरस्कृत पाकिस्तानातील दहशतवाद, भारतव्याप्त जम्मू-काश्मीर आणि आमच्याविषयी 15 वर्षांपासून चुकीची माहिती पसरवणारी मोहीम या चॅटमुळे उघडी पडली आहे. यामुळे भारतातील माध्यमांचे हे संबंध उघडे पडले आहेत, जे आपल्याला न परवडणाऱ्या आण्विक संघर्षाच्या टोकाकडे ढकलत आहेत.

मी पुन्हा एकदा हे सांगतो की, माझं सरकार पाकिस्तान आणि मोदी सरकारच्या फॅसिस्टवादाविरुद्ध युद्धजन्य डाव उघडे पाडत राहिल. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला बेजबाबदार आणि लष्करी अजेंड्यापासून थांबवायला हवं. कारण मोदी सरकार संपूर्ण खंडाला न परवडणाऱ्या अशा एका संघर्षामध्ये ढकलू शकते, असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

पार्थो हे टीआरपी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा गुन्हे शाखेने अलीकडेच दाखल केलेल्या पुरवणी आरोपत्रात केला आहे. याच पुरवणी आरोपपत्रात पार्थो आणि गोस्वामी यांच्यात 2017 पासून झालेले व्हॉट्सअ‍ॅप संवाद गुन्हे शाखेने पुराव्यादाखल न्यायालयासमोर ठेवले आहेत. आरोपत्रातील हे संवाद सुमारे 500 पानांचे आहेत.
यामध्ये अनेक मंत्र्यांविषयी भाष्य आहे. तसेच बालाकोट एअर स्ट्राईक आधीपासूनच अर्णब गोस्वामी यांना माहिती होता, असं दाखवून देणारी चर्चा देखील आहे. यानंतर ट्विटरवर गेल्या शनिवारी संध्याकाळपासूनच Balakot ट्रेंड होऊ लागले. असा दावा केला जातोय की, बालाकोट स्ट्राईकच्या तीन दिवस आधीपासूनच अर्णब गोस्वामी यांनी व्हॉट्सएप चॅटवर म्हटलं होतं की काही मोठी घटना घडणार आहे. 
सामान्य हल्ल्यापेक्षा मोठा...
असा दावा केला जातोय की 23 फेब्रुवारी 2019 रोजी व्हॉट्सऍप चॅटमध्ये अर्णब यांनी Broadcast Audience Research Council चे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांना चॅटमध्ये 'सामान्य हल्ल्यापेक्षा मोठा...' असं म्हटलं होतं. त्यानंतर तीनच दिवसांनंतर 26 फेब्रुवारी 2019 ला भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केला होता. पुलवामामध्ये CRPF चे 40 जवान शहीद झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com