ब्रेक्‍झिटचे स्वप्न साकार; भारतावर असे होणार सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम

Brexit and its impact on India
Brexit and its impact on India

लंडन : ब्रिटनने शुक्रवारी (ता. 31) रात्री 11 वाजता युरोपिय महासंघातून (ईयू) अधिकृतरीत्या काडीमोड घेतला. "ईयू'शी असलेले ब्रिटनचे 47 वर्षांपासूनचे जुने संबंध संपुष्टात आले. युरोपिय महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनमधील काही भागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला, तर एका समुदायाने मात्र नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी, याचा जगावर आणि भारतावर सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही प्रकारे परिणाम होणार आहे.

जगावर परिणाम
युरोपिय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्याच्या घटनेचा भारतासह जगावर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. भारतासाठी हा निर्णय चांगला व वाईट असा दोन्ही प्रकारे होणार आहे.

भारतावर नकारात्मक परिणामांची शक्‍यता
- सेंसेक्‍स आणि निफ्टीत घसरण
- पौंडचे मूल्य कमी झाल्याने सध्याच्या करारांत तोटा
- देशाच्या औद्योगिक क्षेत्रासाठी अडचण
- परकी चलनाचा वापर आणि डॉलरचे मूल्य वाढल्यास रुपयाचे अवमूल्यन
- पौंड स्टर्लिंगची किंमत घसरल्याने ब्रिटनला होणाऱ्या निर्यातीतून नुकसान
- भारतात गुंतवणूक धोकादायक असल्याचा समज झाल्यास परकी निधी बाहेर जाण्याची भीती
- लंडन शेअर बाजारात अनेक भारतीय कंपन्या नोंदणीकृत आहेत आणि अनेक कंपन्यांचे मुख्यालय लंडनला आहे. ब्रिटन याचा फायदा घेण्याची शक्‍यता

सकारात्मक परिणाम
- भारत व ब्रिटनमधील व्यापाराला प्रोत्साहन
- भारताबरोबर द्विपक्षीय व्यापार संबंधांवर स्वतंत्र चर्चा शक्‍य
- ब्रिटनची चलन घसरण भारतासाठी लाभदायी ठरण्याची आशा
- पौंडचे मूल्य कमी झाल्यास भारतीय कंपन्यांना जास्तीत जास्त मालमत्ता खरेदी करता येईल
- अशांत परिस्थितीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांसाठी स्थिर आणि विकास या दृष्टीने भारतात सकारात्मक वातावरण
- पौंडचे मूल्य घसरल्याने ब्रिटनमधून आयात करणाऱ्यांसाठी लाभदायी
- ब्रिटनमध्ये सक्रिय असलेल्या भारतीय निर्यातदार कंपन्यांनाही फायदेशीर

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या आधी जाहीर केलेल्या एका व्हिडिओ संदेशात या ऐतिहासिक क्षणांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. ""ब्रेक्‍झिटच्या मोहिमेचे नेतृत्व 2016मध्ये ज्यांनी केले त्यांच्यासाठी ही नवी पहाट आहे. आपल्या महनीय देशाची पुढील वाटचाल सुरू होत आहे. ब्रिटनमधील सर्वांसाठी हा क्षण आशा आणि उमेदीचा ठरेल असा विश्‍वास देणारा आहे. ही केवळ कायदेशीर मुक्तता नाही, तर खऱ्या अर्थाने देशाची फेरबांधणी आणि बदलाचा काळ आहे. आता तुम्ही देशाच्या कोणत्या भागात जन्मला यावरून तुमचे स्वतःचे किंवा कुटुंबाचे अस्तित्व अवलंबून राहणार नाही. संपूर्ण ब्रिटनच्या क्षमतेला यातून बळ मिळणार आहे,'' असे जॉन्सन म्हणाले.

जीएसटीबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; जेटलींचीही आठवण

ब्रिटनची "ईयू'मधून बाहेर पडण्याची तयारी 2016मध्ये झाली. त्या वेळी उत्तर इंग्लंडमधील सदरलॅंड शहराने जून 2016 मध्ये "ईयू'तून बाहेर पडण्यास समर्थन देण्याची घोषणा केली होती. तत्कालीन पंतप्रधान जॉन मेयर यांनी "बेक्‍झिट'वर जनमत घेण्याचे आश्‍वासन त्या वेळी दिले होते. जनमतातून "ब्रेक्‍झिट'ला कौल मिळाल्यानंतर साडेतीन वर्षांनंतर ही प्रक्रिया काल पूर्ण झाली. ब्रिटन 1973 मध्ये युरोपिय महासंघात सहभागी झाला होता. त्यानंतर 47 वर्षांनंतर तो बाहेर पडल्याने आता "ईयू'मध्ये 27 सदस्य देश उरले आहेत. या बदलाचा परिणाम लगेचच दिसणार नाही, असे "ईयू'च्या प्रमुखांनी सांगितले. कारण "ईयू'- ब्रिटनमध्ये या आठवड्यात झालेल्या करारानुसार 11 महिन्यांचा संक्रमण काळ निश्‍चित केला आहे. ब्रिटिश नागरिक 31 डिसेंबरपर्यंत "ईयू'च्या सदस्य देशांमध्ये काम आणि व्यवसाय करू शकतील. हा नियम "ईयू'तील सदस्य देशांतील नागरिकांनाही लागू होईल.

"ईयू'तून बाहेर पडण्याचे ब्रेक्‍झिट समर्थकांनी स्वागत केले आहे. "ईयू'च्या नेत्यांना मात्र ब्रिटन बाहेर पडल्याचे दुःख वाटत आहे. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत आम्ही एक देश, एक संस्था आणि एक समाज या रूपात जवळ आलो होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com