India Vs Canada: इलॉन मस्कने ट्रूडोंवर केली सडकून टीका; म्हणाले, 'कॅनडाचा तो निर्णय लाजिरवाणा'
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारताचे आणि कॅनडाचे संबध तणावपुर्ण झाले आहेत. काही देशांनी कॅनडाची बाजू घेतली तर काहींनी भारताची बाजू घेत जस्टिन ट्रुडो यांच्यावर सडकून टीका केली आहे. अशातच टेस्ला कंपनीचे सह-संस्थापक, SpaceX चे संस्थापक आणि CEO इलॉन मस्क यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर कडाडून टीका केली आहे. (Latest Marathi News)
ट्रूडो यांच्यावर 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ठेचल्याचा' आरोप केला आहे. अलीकडेच कॅनडाच्या सरकारने यू.एस. ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवांसाठी नियम तयार केले त्यानंतर मस्क यांनी हे वक्तव्य केले आहे.
इलॉन मस्क म्हणाले, 'ट्रुडो कॅनडातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ठेचून काढण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लाजिरवाणा आहे.' ट्रुडो सरकारवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात काम केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. (Marathi Tajya Batmya)
फेब्रुवारी 2022 मध्ये, ट्रूडो यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच आणीबाणीच्या अधिकारांचा वापर केला आणि कोविड-19 साथीच्या प्रतिबंधांविरुद्ध ट्रक चालकांचे निषेध थांबवण्यासाठी सरकारला अतिरिक्त अधिकार दिले. त्यावेळी हे चालक लसीकरणाच्या आदेशाला विरोध करत होते.
भारत आणि कॅनडामध्ये तणावाचे वातावरण
दरम्यान, कॅनडाच्या पंतप्रधानांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताची भूमिका असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. तर, भारताने हे दावे पूर्णपणे फेटाळले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, हरदीपसिंग निज्जरची हत्या झाल्याच्या दाव्याला समर्थन देण्यासाठी कॅनडाने अद्याप कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांच्या हत्येत भारतीयांचा सहभाग असल्याच्या आरोपानंतर भारताने कॅनडाची व्हिसा सेवा स्थगित केली आहे.(Latest Marathi News)
भारताच्या कठोर भूमिकेनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भूमिका मवाळ होऊ लागली आहे. ट्रूडो म्हणाले की, कॅनडा भारताशी 'जवळचे संबंध' निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. 'भारत ही वाढती आर्थिक शक्ती आणि महत्त्वाची भू-राजकीय शक्ती आहे. आम्ही गेल्या वर्षी आमच्या इंडो-पॅसिफिक रणनीतीत मांडल्याप्रमाणे, आम्ही भारतासोबत घनिष्ठ संबंध निर्माण करण्याबाबत खूप गंभीर आहोत. साहजिकच, कायद्याचे राज्य असलेला देश या नात्याने, आम्हाला या प्रकरणातील संपूर्ण तथ्ये मिळतील याची खात्री करण्यासाठी भारताने कॅनडासोबत काम करणे आवश्यक आहे यावर जोर देणे आवश्यक आहे, असंही ट्रुडो म्हणाले आहेत.