पृथ्वीवरचं सगळं पाणी अचानक संपेल किंवा सगळं बर्फ वितळू लागेल आणि प्रलय येईल, अशा अनेक शक्यता, तर्कवितर्क सध्या मांडले जात आहेत. भविष्यात माणसांवर रोबोट राज्य करू लागेल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. शास्त्रज्ञ अशी भीती व्यक्त करत आहेत. हे सगळं होईल, पण कधी होईल हे माहित नाही. पण तरीही याची तयारी आता भारतासह अनेक देशांनी सुरू केली आहे. म्हणजे नक्की काय केलं आहे, चला जाणून घ्या.
अनेक वर्षांपूर्वी पृथ्वीवर प्रलय आला आणि त्यामध्ये डायनासोरसह बऱ्याचश्या गोष्टी आपण गमावून बसलो. हे प्राणी, वनस्पती, या गोष्टी जर आज आपल्याकडे असत्या तर कदाचित चित्र काहीतरी वेगळं असतं आणि माणसाच्या प्रगतीला त्याची मदत झाली असती. पण आता जेव्हा पुढच्या वेळी प्रलय येईल किंवा अशी विनाशकारी परिस्थिती उद्भवेल, तेव्हा आपण अशा प्रजाती पूर्णपणे गमावून बसू नये यासाठी एक तिजोरी म्हणता येईल, असं काही तयार करण्यात आलं आहे. थोडक्यात ही एक ग्लोबल जनुकीय बँक आहे, असंही आपण म्हणू शकता. ही गोष्ट म्हणजे डूम्स डे वॉल्ट.
नॉर्वेच्या डोंगरदऱ्यांमध्ये १०० देशांच्या सहकाऱ्याने ही डूम्स डे वॉल्ट तयार केली जात आहे. ही वॉल्ट खरंतर २००८ मध्ये बनवण्यात आली होती. पण जगाला याबद्दल खूप उशीरा माहिती मिळाली आहे. अजूनही इथं पिकांच्या प्रजाती साठवण्याचं काम सुरू आहे. जिथे ही डूम्स डे वॉल्ट तयार करण्यात आली आहे, ते ठिकाणी उत्तर धृवाच्या सर्वात जवळ आहे. ज्या देशांच्या आपल्याकडील बियाण्यांच्या प्रजाती या वॉल्टमध्ये ठेवायच्या आहेत, त्यांना नाॉर्वे सरकारसोबत एक करार करावा लागतो. या वॉल्टमध्ये जमा करण्यात आलेल्या बियाण्यांच्या प्रजातीवर मालकीहक्क हा नॉर्वे सरकारचा नव्हे तर त्या त्या देशांचाच राहतो.
सिरीया हा या वॉल्टचा वापर करणारा पहिला देश
डूम्स डे वॉल्टचा वापर करणारा सिरीया हा पहिला देश होता. सिव्हील वॉरच्या काळामध्ये जेव्हा दुष्काळामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती, तेव्हा पहिल्यांदा या वॉल्टचा वापर करण्यात आला होता. हजारो बियाणे गुप्तपणे मोरोक्को आणि लेबनन इथं पाठवण्यात आले. यामध्ये गहू, चणे, डाळ यांच्या जवळपास ३८ हजार नमुन्यांचा समावेश होता. पण सिरीयामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या वस्तूंचा योग्य वापर होऊ शकला नाही. पण शास्त्रज्ञांच्या मते, सिरीयामध्ये याचा योग्य वापर झाला नाही, पण नैसर्गिक संकटांच्या काळामध्ये जगभरात याचा वापर नक्कीच होऊ शकेल.
काय आहेत या वॉल्टची वैशिष्ट्ये?
जमिनीच्या पृष्ठभागापासून जवळपास १२० मीटर खाली असलेल्या या वॉल्टचे दरवाजे बुलेटप्रूफ आहेत. अणुयुद्ध, महामारी, प्रलय अशा गंभीर संकटांनंतर पृथ्वीवर पुन्हा एकदा शेती करण्यासाठी ही वॉल्ट उपयोगी ठरेल. यामध्ये जवळपास सर्वच देशांमधले ८ लाखांहून अधिक पिकांच्या बियाणांचे नमुने आहेत.
या वॉल्टला एका वर्षामध्ये फक्त ३ किंवा ४ वेळाच बियाणं जमा करण्यासाठी उघडलं जातं. या वॉल्टचं डिझाईनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे वॉल्ट ग्रीन काँक्रिटने तयार केलेलं आहे आणि ४०० फूट लांब टनल माऊंटन आहे. हे पूर्णपणे बर्फाच्छादित आहे. लाईट नसेल तरीही यामध्ये २०० वर्षांपर्यंत बियाणं बर्फामध्ये राहू शकतात. या वॉल्टची क्षमता जवळपास ४५ लाख प्रकारच्या बियाणांचं संरक्षण करण्याची आहे. या वॉल्टमध्ये एक चेंबर आहे ज्यात तीन कप्पे आहेत. प्रत्येकामध्ये कोट्यवधी बियाणं साठवण्याची शक्यता आहे. सध्या फक्त एकच कप्पा कार्यरत आहे.
या वॉल्टच्या दारावर बर्फाचा दाट थर आहे.याच्या आतलं तापमान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उणे १८ डिग्री इतकं राखलं जातं. पूर्ण प्रणाली अशा प्रकारे कार्यरत आहे की जर या वॉल्टचा वीजपुरवठा बंद झाला तरी बियाणी १०० वर्षांपर्यंत सुरक्षित राहू शकतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.