वॉशिंग्टन- भारत आणि चीनदरम्यान गलवान खोऱ्यावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भारताने आक्रमक पवित्रा घेतल्याने चीनच्या सैनिकांनी गलवान खोऱ्यातून माघार घेतली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी भारताचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. चीनच्या आक्रमकतेला भारताने सर्वोत्कृष्ट पद्धतीने उत्तर दिलं असल्याचं ते म्हणाले आहेत.
लष्कराचा मोठा निर्णय; जवानांना फेसबुक, इंस्टाग्राम वापरता येणार नाही!
चीनचे आपल्या शेजारी राष्ट्राशी नेहमीच वाद राहिले आहेत. चीन नेहमीच विस्तारवादी राहिला आहे. अशाप्रकारची गुंडगिरी जगाने चालून घेतली नाही पाहिजे. मी भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चीनसंबंधात चर्चा केली. चीनने सीमा भागात आक्रमक हालचाली सुरु केल्या होत्या. भारताने त्यांना चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आहे, असं पोम्पियो म्हणाले आहेत.
पोम्पियो यांनी भारतीय क्षेत्रातील चीनच्या घुसखोरीबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे दोन्ही देशातील स्थिती स्फोटक बनली होती. पैंगोंग त्सो, गलवान खोरे, गोगरा हॉट स्प्रिंग आणि पूर्व लडाखच्या इतर भागात उभय देशांनी आपापले सैनिक एकमेकांसमोर उभे केले होते. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली होती.
पोम्पियो यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावरही टीका केली. चिनी विस्तारवादाला मोठ्या संदर्भात आपण पाहिलं पाहिजे. चीनचे सीमेलगतच्या प्रत्येक देशासोबत वाद आहेत. चीनने नुकतेच भूतानसोबत सीमा वाद उकरुन काढला आहे. चीनच्या या दादागिरी प्रवृत्तीला सर्व देशांनी उत्तर द्यायला हवं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या दादागिरीला गंभीरतेने घेतले आहे, असं ते म्हणाले आहेत.
कोरोनाचं संकट हे भारतासाठी एक संधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
चीनच्या पीपल्स लिबेरेशन आर्मीने (पीएलआय) गलवान खोरे आणि गोगरा हॉट स्प्रिंग येथून किमान 2 किलोमीटरपर्यंत माघार घेतली होती. शिवाय इतर भागातूनही चिनी सैन्य माघार घेत असल्याचं कळत आहे. याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात दुरध्वनीवरुन चर्चा झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला होता. डोवाल आणि वांग यी हे भारत-चीन सीमावाद चर्चेचे विशेष प्रतिनिधी आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.