बीजिंग - उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी चीनच्या तुलनेत उजवी असल्याचे मत चीनच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. मात्र भारताच्या या यशानंतर चीनकडून आता देशांतर्गत उपग्रह प्रक्षेपण क्षेत्राचे झपाट्याने व्यावसायिकीकरण केले जाण्याची शक्यता असल्याचे मत देशांतर्गत येथील शांघाय छोटे उपग्रह (मायक्रोसॅटेलाईट्स) अभियांत्रिकी केंद्राच्या नवीन तंत्रज्ञान विभागाचे संचालक झांग योंघे यांनी व्यक्त केले आहे.
याचबरोबर, भारताच्या या यशामुळे "स्पेस रेस' सुरु होण्याचा इशाराही चीनकडून देण्यात आला आहे. तेव्हा भारताच्या यशाचे कौतुक करतानाही चीनचा मत्सर लपत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताच्या या कामगिरीचा परिणाम "मर्यादित' असल्याचे सांगत या यशाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्नही चीनकडून करण्यात आला आहे. लष्करी व व्यावसायिक उपग्रहांच्या विकास व संशोधनामध्ये भारत अद्याप चीन, रशिया व अमेरिकेच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे मतही यासंदर्भात ग्लोबल टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या लेखामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.
"2014 मध्ये मंगळ ग्रहावर अवकाशयान पाठविणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला. चीनने 2012 मध्ये राबविण्यात आलेल्या मंगळ मोहिमेत अपयश आले होते. यामुळे दोन देशांमधील स्पर्धा अधिक ठळक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताकडून गेल्या आठवड्यात करण्यात आलेले उपग्रह प्रक्षेपण हे या देशाचे या क्षेत्रातील नवे यश आहे. भारताकडून नुकत्याच अवकाशात सोडण्यात आलेल्या उपग्रहांपैकी बहुसंख्य उपग्रह हे इस्राईल, कझाकस्तान, स्वित्झर्लंड आणि अमेरिका या देशांचे होते,'' असे झांग म्हणाले.
|